११७ शिक्षकांच्या नियमबाह्य आंतरजिल्हा बदल्या रद्द
By Admin | Updated: April 27, 2017 00:24 IST2017-04-27T00:24:04+5:302017-04-27T00:24:04+5:30
भंडारा जिल्हा परिषदेने ११७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या नियमबाह्य केल्या.

११७ शिक्षकांच्या नियमबाह्य आंतरजिल्हा बदल्या रद्द
विभागीय आयुक्तांचा आदेश : अपात्र शिक्षकांना पूर्वीच्याच जिल्ह्यात पाठवा, ३० एप्रिलपर्यंत मागविला अमलबजावणीचा अहवाल
प्रशांत देसाई भंडारा
भंडारा जिल्हा परिषदेने ११७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या नियमबाह्य केल्या. यात आर्थिक गैरव्यवहार व शासकीय नियम डावल्यात आल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यात सर्व बदल्या नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ११७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या रद्द करण्याचे आदेश विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिले आहे. जिल्हा परिषदने या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून ३० एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्यात यावे, असे निर्देश दिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत असा नियमबाह्य बदल्या करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी संगनमत करून आर्थिक व्यवहारातून या बदल्या केल्याचा आरोप ज्ञानेश्वर दिपटे यांनी केला होता. याबाबत त्यांनी विभागीय आयुक्तांना तक्रार केली होती.
दिपटे यांच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली विषयाची विभागीय कार्यालयातील चौकशी पथकाकडून चौकशी केली होती. या चौकशीत जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लेखी बयान नोंदविण्यात आले होते. यात जिल्हा परिषदेने नियमबाह्य व शासकीय परिपत्रकाला डावलून ११७ शिक्षकांच्या बदल्या केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
आंतरजिल्हा बदलीत सामावून घेण्यात आलेल्या शिक्षकांमुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे अनेक शिक्षकांना तालुका सोडून जावे लागले असते, मात्र या बदल्या रद्द झाल्याने अनेक शिक्षकांना आता तालुका किंवा जिल्ह्याबाहेर जावे लागणार नाही.
बदल्या रद्दच्या आदेशामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला असून समायोजनेची कार्यशाळा रद्द करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी ११७ शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्याने या बदल्यांमध्ये सहभागी असलेले पदधिकारी व अधिकारी यांची अडचण वाढली आहे. या बदलीप्रकरणात कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आता उघडकीस येऊ लागले आहे.
चौकशीत या गंभीर बाबी उघड
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत जिल्हा परिषदेने शासन परिपत्रक २९ सप्टेंबर २०११ व १८ आॅक्टोंबर २०१२ मधील तरतुदीचे संपूर्ण उल्लंघन करून प्राप्त प्रस्तावांची ज्येष्ठता डावलली, बदलीचा ६०-४० टक्के चा फार्मूला डावलला, आचारसंहिता लागू असताना शिक्षकांच्या बदल्या केल्या, नियुक्तीचा प्रवर्ग बदलवून आदेश काढले, शिक्षकांचे रोष्टर बदल्यानंतर अद्ययावत करणे, आंतरजिल्हा बदलीचा प्रस्ताव नसताना बदली करणे आदी बाबींमध्ये गंभीर स्वरूपाची अनियमितता तसेच नियमबाह्य चौकशीअंती स्पष्टपणे आढळून आले आहे.
आयुक्तांनी असे दिले आदेश
अपात्र शिक्षक व नियमबाह्य बदल्या या आदेशान्वये रद्द करण्यात येत आहे. त्याऐवजी पात्र शिक्षकांच्या बदल्या शासन परिपत्रकातील कार्यपध्दतीनुसार फेरतपासणी करण्याचे निर्देशित केले आहे. आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना संबंधीत जिल्हा परिषदने ३० एप्रिल रोजी भंडारा येथे रूजू होण्यासाठी कार्यमुक्त करणे, अभिप्रेत असताना इतर जिल्ह्यातून रूजू होण्याकरिता कार्यमुक्त करण्यात आल्यानंतर भंडारा येथे रूजू झाले. आंतरजिल्हा बदलीने रूजू झालेले शिक्षक अपात्र असल्यास त्यांना त्यांच्या पूर्वीच्या जिल्ह्यात परत पाठविण्याबाबत जिल्हा परिषदने कार्यवाही करावी, असे म्हटले आहे.
दिपटे यांनी केले होते हे आरोप
ज्ञानेश्वर दिपटे यांनी केलेल्या आरोपात, ११७ शिक्षकांचे आदेश २३ नोव्हेंबर २०१६ ला काढण्यात आले, परंतु प्रत्यक्षात आदेश १०, ११ व १२ डिसेंबरला सुट्यांच्या कालावधीत देण्यात आले. १२ वी डिएडधारकांना इयत्ता ६ ते ८ चे आदेश देण्यात आले. नगरपरिषद आचारसंहिता असताना आदेश काढले. ६०-४० चा फार्मूला न वापरता नियमबाह्य बदलीचे आदेश काढले. दिपटे यांची पत्नी रायगड जिल्ह्यात कार्यरत आहे. त्यांचा २०१२ मध्ये प्रस्ताव असताना त्यांना वगळून अन्य शिक्षकांना पती-पत्नी एकत्रिकरणात आदेश दिले. आधी आदेश व नंतर रोष्टर तयार करण्यात आल्याचा आरोप आहे.