धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST2020-09-11T05:00:00+5:302020-09-11T05:00:16+5:30

जिल्ह्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे तुमसर तालुक्यातील विविध गावांना फटका बसला आहे. यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र त्यानंतर महसूल विभागाचे कर्मचारी मात्र अद्याप शेतशिवारात फिरले नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. पूरपरिस्थितीतून वाचलेल्या पिकांसाठी कृषी विभागांमार्फत मोठ्या प्रमाणात विविध औषधे पुरवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.हरेंद्र राहांगडाले यांनी केली आहे.

Outbreaks appear to be exacerbated during this time | धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला

धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला

ठळक मुद्देकृषी कर्मचारी नुकसानीच्या कामात व्यस्त : बळीराजा सापडला संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : तुमसर तालुक्यातील पवनारा, बघेडा, चिचोली, कारली, मिटेवानी परिसरात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे धानपिकावर विविध रोग कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. यासाठी कृषी विभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
जिल्ह्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे तुमसर तालुक्यातील विविध गावांना फटका बसला आहे. यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र त्यानंतर महसूल विभागाचे कर्मचारी मात्र अद्याप शेतशिवारात फिरले नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. पूरपरिस्थितीतून वाचलेल्या पिकांसाठी कृषी विभागांमार्फत मोठ्या प्रमाणात विविध औषधे पुरवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.हरेंद्र राहांगडाले यांनी केली आहे. यावर्षी शेतकऱ्यांवर सातत्याने विविध संकटे कोसळली आहेत. आधीच वाढलेल्या धानशेतीच्या खर्चामुळे शेतकरी संकटात आहेत. त्यामुळे आता उरले सुरले पीकही रोगामुळे शेतकऱ्यांच्या हातातून निसटले जाण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मदतीसाठी महसूल विभागाच्या तलाठ्यांनी ग्रामीण स्तरावर पाहणी करून पंचनामे करण्याची गरज आहे. शेतकरी चिंतातूर झाला असून पवनारा, चिचोली, बघेडा, कारली, चिखला परिसरात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात रोवणी आटोपली होती. त्यानंतर काही दिवस सातत्याने ऊन व ऑगस्ट अखेर सुरु असलेल्या संततधार पावसामुळे खोडकिडा, गादमाशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कडा करपा रोगही वाढत असून त्यामुळे काही ठिकाणी धानपीक पिवळे पडत असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

तलाठ्यांनी बळीराजाची दखल घेण्याची गरज
प्रत्येक तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ग्रामीण स्तरावर कृषी कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र याला काही ठिकाणी तलाठ्यांचा अपवाद असल्याचेही दिसून येत आहे. महसूल विभागाचे ग्रामीण भागातील तलाठी कारणे सांगून शेतकऱ्यांना पाहणीसाठी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मदत मिळण्यासाठी ज्यांच्या हाती महसूल विभागाची सूत्रे आहेत तेच तलाठी बळीराजाला नडवत असल्याचे काही ठिकाणी दिसत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Web Title: Outbreaks appear to be exacerbated during this time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती