विरोधकांना आले ‘बुरे दिन’
By Admin | Updated: June 27, 2015 00:48 IST2015-06-27T00:48:14+5:302015-06-27T00:48:14+5:30
६० वर्षे सत्ता उपभोगणारे आता सत्तेबाहेर पडल्याने, भ्रष्टाचार खितपत पडलेल्या विरोधकांचे आता बुरे दिन सुरु झाले आहेत.

विरोधकांना आले ‘बुरे दिन’
तुमसरात प्रचारसभा : मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा
तुमसर : ६० वर्षे सत्ता उपभोगणारे आता सत्तेबाहेर पडल्याने, भ्रष्टाचार खितपत पडलेल्या विरोधकांचे आता बुरे दिन सुरु झाले आहेत. आता सहा महिन्यातच आम्हाला हिशोब मागत आहेत. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या सर्वांगिन विकासासाठी प्रयत्नशील असून आम्ही भ्रष्टाचाऱ्यांची गय करणार नाही, असा ईशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ तुमसर येथे आले असता ते बोलत होते. मंचावर खासदार नाना पटोले, आ.चरण वाघमारे, शिशुपाल पटले, उपेंद्र कोठेकर उपस्थित होते.
यावेळी ना.फडणवीस म्हणाले, सहा महिन्यात युती सरकारने शेतकऱ्यांना सात हजार कोटीची मदत दिली. यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जासाठी १२ टक्के व्याज द्यावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. त्यासाठी राज्य सरकारने कर्जाच्या पुनर्गठनाचा निर्णय घेतला. आता कर्जाची मर्यादा तीन वर्षानी वाढवून ती पाच वर्षापर्यंत करण्यात आली. यात एक वर्षापर्यंत बिनव्याजी कर्ज, दुसऱ्यावर्षी दोन टक्के तर तिसऱ्या वर्षीपासून टक्केवारी वाढवून शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीकरिता सवलत दिली आहे. युती सरकार शेतकऱ्यांची पत तयार करण्याचे काम करीत आहे. विरोधक ‘अच्छे दिन कधी येणार’ असे टोमणे मारत असले तरी विरोधकांना न जुमानता सर्वसामान्याना न्याय कसा देता येईल, भ्रष्टाचार निर्मुलन कसे करता येईल, या दृष्टीने काम करीत आहे. भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने १०० कोटी रुपयांचा धान घोटाळा केल्याचे चौकशीतून उघडकीस आल्याचे सांगून घोटाळे करणाऱ्यांची खैर नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी खा.पटोले म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपाची सत्ता होती. त्यावेळी केंद्रात व राज्यात युपीएचे सरकार होते. तरीदेखील भाजपने सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले. आता देशात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये विजयी करण्याचे आवाहन केले.
आमदार चरण वाघमारे म्हणाले, राज्यात भंडारा जिल्हा परिषदेने जनहिताची सर्वाधिक कामे केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतल्याचे सांगितले. प्रास्ताविक भाजप महामंत्री प्रदीप पडोळे यांनी केले. संचालन युवराज जमईवार यांनी तर आभारप्रदर्शन प्रमोद घरडे यांनी केले. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)