दीड तास ‘ट्रॉफिक जाम’

By Admin | Updated: June 15, 2014 23:21 IST2014-06-15T23:21:48+5:302014-06-15T23:21:48+5:30

वाहतूक विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, अनियोजन तथा पार्किंगच्या अभावामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रचंड बोजवारा उडाला आहे. शहराच्या हृदयस्थळी दर रविवारी भरणाऱ्या बाजार परिसराच्या मुख्य

One and a half hours 'Traffic Jam' | दीड तास ‘ट्रॉफिक जाम’

दीड तास ‘ट्रॉफिक जाम’

नागरिक संतप्त : मुख्य मार्ग ठरला अडचणीचा, वाहतूक पोलीस बनले मूकदर्शक
भंडारा : वाहतूक विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, अनियोजन तथा पार्किंगच्या अभावामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रचंड बोजवारा उडाला आहे. शहराच्या हृदयस्थळी दर रविवारी भरणाऱ्या बाजार परिसराच्या मुख्य मार्गावर ट्रॉफीक जाम होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज सायंकाळी ५ वाजतापर्यंत ते ६.४५ पर्यंत मुख्य मार्गावर ट्रॉफीक जाम असल्यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.
दुसरीकडे वाहतूक पोलिसांची कमान सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तिथून पळ काढला. सव्वा लक्ष नागरिकांची वसाहत असलेल्या भंडारा शहरात कुठेही पार्कींगची व्यवस्था नाही. शास्त्री चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा रस्ता अत्यंत महत्वपूर्ण व तेवढाच दाट रहदारीचा समजला जातो. असंख्य दुकाने, फुटपाथ दुकानदार याच्यासह खासगी दवाखाने, पॅथॉलॉजी, पोलीस ठाणे, बँका, पोस्ट आॅफीस व बसस्थानक याच मार्गावर आहेत. त्यामुळे अत्यंत वर्दळ पाहायला मिळते. रविवारी मुख्य बाजार तर बुधवारी मिनी बाजार भरतो. पोस्ट आॅफीस चौक ते संत तुकडोजी मार्गापर्यंतच्या रस्त्यावर बाजाराच्या दिवशी मोठी गर्दी असते. दुकानांसमोर पार्किंग नसल्याने नागरिक रस्त्यावरच मनमर्जीने वाहने ठेवतात.
दुकानदारांचेही अतिक्रमण
मुख्य मार्गावर लहान सहान दुकानदारांनीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. नझूलची नालीही अतिक्रमणातून सुटलेली नाही. अतिक्रमणाची कारवाई केल्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे अशीच पाहावयास मिळते. अतिक्रमणाच्या मुद्यावर बळजबरी व मुजोरीपणा वाहतूक समस्येच्या रुपाने नागरिकांसमोर येत आहे.
पोलीस अधीक्षक लक्ष देणार काय?
जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस विभागाचे सेनापती या समस्येकडे लक्ष देणार काय? असा खडा सवाल आहे. वाहतूक पोलीस खरेच नियोजन करीत नाहीत काय? महसूल प्रशासन यावर तोडगा काढण्याचा विचारही करीत नाहीत काय? असा सवालही यावेळी उपस्थित होत आहे. दोन दशकापासूनची ही समस्या एका दिवसात सुटणारी नसणारी तरी जिल्हा पोलीस अधीक्षकाना आव्हान देणारी आहे.
एकेरी वाहतूकीचाही बोजवारा
सन २००७ मध्ये तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक सुरेश सागर यांनी गांधी चौक ते बसस्थानक मार्गापर्यंतची वाहतूक व्यवस्था एकेरी राहील असे नियोजन केले होते. काही दिवस हा फंडा चांगला राबला. मात्र अतिक्रमणाचा मुद्दा व पार्कींगचा अभाव यामुळे सद्यस्थितीत या व्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक व्यवस्थाही कुचकामी ठरली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: One and a half hours 'Traffic Jam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.