घरकुलासाठी वयोवृद्धाची भटकंती

By Admin | Updated: January 13, 2015 22:55 IST2015-01-13T22:55:38+5:302015-01-13T22:55:38+5:30

लोहार समाज जिल्ह्यात सर्वत्र विखुरला आहे. जीवनाचा गाढा चालविण्यासाठी हे समाज बांधव मिळेल त्या जागेवर दुकान मांडून पोटाची खडगी भरतो. शासनाने अशा गरजुंना घरकुल योजना

Old age wandering | घरकुलासाठी वयोवृद्धाची भटकंती

घरकुलासाठी वयोवृद्धाची भटकंती

चिचाळ : लोहार समाज जिल्ह्यात सर्वत्र विखुरला आहे. जीवनाचा गाढा चालविण्यासाठी हे समाज बांधव मिळेल त्या जागेवर दुकान मांडून पोटाची खडगी भरतो. शासनाने अशा गरजुंना घरकुल योजना अस्तित्वात आणली आहे. मात्र, या योजनांचा लाभ त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहे.
लोहार समाजाचे अनेक कुटूंब उघड्यावर वास्तव्य करीत असल्याचे चित्र पवनी तालुक्यात बघायला मिळते. गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याची मागणी लोहार समाज पवनी तालुका उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी केली आहे. शासनाने गरीबांना अन्न, वस्त्र, निवारा मिळावा म्हणून विविध योजना अंमलात आणल्या आहेत. दारिद्रय रेषेखालील कुटुंबात जिवन जगणाऱ्यांना इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना आदी योजना राबविल्या जातात. पंरतु या योजनेचा लाभ गरजूंना मिळाला नाही. तर याचा लाभ धनाढ्य लोकांना मिळत आहे.
धनाढ्य लोक शासनाच्या योजनेचा फायदा घेऊन जवळचे लाखो रुपये खर्च करुन मोठमोठे बंगले बांधत आहेत. मात्र गरीब जनता या योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित विभागात पायपीट करीत आहे. पवनी तालुक्यातील भटक्या जमाती ‘ब’ लोहार समाजातील गोसे खुर्द येथील शालीकराम कृष्णा बागडे मागील चार वर्षापासून घरकुलासाठी ग्रामपंचायतीच्या पायऱ्या झिजवत आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी त्यांचे नाव वरिष्ठांना पाठविल्याचे सांगुन मोकळे होता.
मागील अतिवृष्टीत बागडे यांचे घर कोसळल्याने त्यांना राहण्याचा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. बागडे यांना राहण्याचे घर नसल्याने ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना विनवणी करुन घरकुलाची मागणी केली. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शालिकराम बागडे व त्यांचे तिन भाऊ आसाराम बागडे, भगवान बागडे, दयाराम बागडे, गिरधर बागडे यांचे अतिवृष्टीत घर पडल्याने जागा अल्पशी व कुटूंब मोठे त्यांचे जगणे म्हणजे गाई, बैलाचा गोठा अशा जागेत वास्तव्य करित आहेत. सदर ग्रामपंचायतीमध्ये प्रतिक्षा यादीच लावण्यात न आल्याने आपला नंबर केव्हा लागणार हे लाभार्थ्यांना कळणार कसे? ग्रामपंचायतीने प्रतिक्षा यादी प्रकाशीत न केल्याने येथील गरजू लाभार्थ्यांना वगळून ज्यांना जास्त गुण आहेत व ते सरपंच, सदस्य यांचे जवळीक आहेत, अशांना त्यांचा लाभ दिला जात असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी तात्काळ प्रतिक्षा यादी फलकावर प्रकाशित करावी व गरजूंना घरकुलाचा लाभ द्यावे, अशी मागणी लोहार समाज पवनी तालूका उपाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, शालीकराम बागडे यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Old age wandering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.