वैनगंगेच्या पाण्यावर तेलाचा तवंग

By Admin | Updated: April 28, 2017 00:27 IST2017-04-28T00:27:29+5:302017-04-28T00:27:29+5:30

एकेकाळी भंडारा जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेली वैनगंगा नदी आता दिवसेंदिवस जीवघेणी ठरू लागली आहे.

Oil tanker on Wainganga water | वैनगंगेच्या पाण्यावर तेलाचा तवंग

वैनगंगेच्या पाण्यावर तेलाचा तवंग

नदीपात्रातील पाणी प्रदूषित : रसायनमिश्रीत पाण्यात स्लो पॉयझन
नंदू परसावार भंडारा
एकेकाळी भंडारा जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेली वैनगंगा नदी आता दिवसेंदिवस जीवघेणी ठरू लागली आहे. मागील दोन वर्षांपासून नाग नदीच्या पाण्याने दूषित झाल्यानंतर ईकार्निया या वनस्पतीने नदीपात्रात आक्रमण केले. आता कारधाजवळील एका कारखान्यातील रसायनमिश्रीत पाण्यामुळे नदीपात्रावर तेलाचा तवंग दिसत आहे.
राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यताप्राप्त गोसेखुर्द धरण पूर्ण होऊन या धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे या दिशेने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या धरणात २४५ मीटरपर्यंत जलस्तर वाढविण्याचे काम सुरू झाले होते. जलस्तर वाढविण्याचे काम सुरू झाल्यामुळे बॅकवॉटरमुळे वैनगंगा नदीपात्रात पाणीच पाणी दिसत होते. मागील दोन वर्षे नदीपात्रात सहा मीटर जलसाठा होता. दरम्यान नागनदीचे प्रदूषित पाणी, भंडारा शहरातील सांडपाणी आणि या दूषित पाण्यामुळे उगवलेल्या ईकार्निया वनस्पतीमुळे नदीपात्र अस्वच्छ झाले. आता धरणातील पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीपात्रातील जलस्तर कमी झाला आहे. शहरालगतच्या कारखान्यातील रसायनमिश्रीत पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्यामुळे नदीतील पाण्यावर तेलाचा जाडसर तरंग दिसू लागला आहे.
ईशाऱ्यानंतरही पाणी प्रदूषितच
नाग नदीचे प्रदूषित पाणी गोसेखुर्द धरणात सोडण्यात येऊ नये, असे निर्देश खासदार नाना पटोले यांनी धरण विभागाला दिले होते. अन्यथा गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडून धरणातील साठवून ठेवलेले पाणी सोडण्यात येईल, असा गर्भित ईशारा खा.पटोले यांनी दोन वर्षांपूर्वी दिला होता. मात्र त्यानंतरही धरण विभागाने कोणतीही उपाययोजना केली नाही. परिणामी नदी पात्र प्रदूषितच राहिले.

‘नीरी’च्या अहवालाकडे डोळेझाक
नागनदीच्या दूषित पाण्यामुळे गोसेखुर्द धरणातील पाणी आणि पवनी ते भंडारा तालुक्यापर्यंत वैनगंगा नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे. या पाण्यातील रासायनिक घटकांमध्ये ‘स्लो पायझन’ आहे. परिणामी भंडारावासियांना चर्मविकारासह अन्य आजारांनी ग्रासले आहे. नागपूर येथील ‘नीरी’ या पर्यावरण संस्थेने भंडारा जिल्ह्याच्या भू-गर्भातील ८० टक्के पाणी असून पाणी आणखी प्रदूषित होऊ देऊ नका, असे अहवालात म्हटले होते.

पोहणाऱ्यांनीही फिरविली पाठ
दररोज सकाळी ५ ते ८ या वेळेत वैनगंगा नदीपात्रात पोहणाऱ्यांची खूप गर्दी असते. काही दिवसांपूर्वी नाग नदीच्या दूषित पाण्याचा जलतरणपटूंना त्रास होता. पाण्याच्या दुर्गंधीमुळे त्यांचे पोहणे बंद झाले होते. आता काही दिवसांपासून पाण्यावर तेलाचा तरंग असल्यामुळे जलतरणपटूंमध्ये कमालिचा असंतोष आहे. पोहण्यासाठी पूर्वीसारखी गर्दी अलिकडे मंदावली असल्याचे मागील अनेक वर्षांपासून नदीपात्रात नियमित पोहणारे डॉ. पुनम बावनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

 

Web Title: Oil tanker on Wainganga water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.