सागर तलाव विकासापासून वंचित
By Admin | Updated: May 15, 2014 23:17 IST2014-05-15T23:17:19+5:302014-05-15T23:17:19+5:30
शहरातील संत कबीर वॉर्डात असलेला सागर तलाव परिसराची शान आहे. अजान नागरिकांकडून या तलावात कचरा टाकणे सुरु असल्यामुळे तलावाचे सौंदर्य नष्ट झाले आहे.

सागर तलाव विकासापासून वंचित
भंडारा : शहरातील संत कबीर वॉर्डात असलेला सागर तलाव परिसराची शान आहे. अजान नागरिकांकडून या तलावात कचरा टाकणे सुरु असल्यामुळे तलावाचे सौंदर्य नष्ट झाले आहे. तलावातील पाणी दूषित झाले असून परिसरातही घाण पसरली आहे. शहरात मोजके तलाव असताना त्याचे सौंदर्य राखता येत नसेल तर ते दुर्देवी आहे. शहरातील तलावांपैकी सागर तलावा हा महत्त्वाचा तलाव आहे. सर्वात मोठा तलाव असलेल्या या तलावात वर्षभर पाणी राहते. शहराच्या इतिहासातही सागर तलावाची नोंद आहे. परंतु तलावाच्या दुर्देशेकडे कुणाचेही लक्ष जात नाही. तलावाच्या चौफेर घाण पसरली आहे. गणेशोत्सव, श्रीकृष्ण जन्माष्ठमी उत्सवात शहरातील भाविक विसर्जनासाठी येतात. त्यावेळी या तलाव परिसराला जत्रेचे स्वरुप येते. या वॉर्डातील तलावाची साफसफाई कधी करण्यात येत नाही. या वॉर्डातील शौचालय परिसरात घाण, फुटलेल्या नाल्या, जागोजागी साचलेला कचरा, डासांचा प्रादुर्भाव समस्या आहेत. या वॉर्डातील काही ठिकाणचे रस्ते उखडलेले आहेत. त्याचा आवागमनासाठी त्रास होतो. या वॉर्डात सामान्य कुटूंबातील नागरिक राहतात. या परिसरात सांडपाणी वाहून जाण्यासाठी असलेली नाली मोठी आहे. परंतु नालीमधील गाळ नियमित सा करण्यात येत नसल्यामुळे घाण वाढत आहे. सांडपाणी साचून राहत असल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. परिणामी डासांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या वॉर्डातील काही नागरिकांशी चर्चा केली असता ते म्हणाले, या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या नाही. त्यामुळे वॉर्डातील चहूबाजुला घाण पसरली आहे. पावसाळ्यात जागोजागी पाणी साचलेले असल्यामुळे आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. याच वॉर्डात जिल्हा सामान्य रुग्णालय असून या परिसरातील घाणीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. (नगर प्रतिनिधी)