लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करीत असतानाच नागरीकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी पोलिसांना मात्र दिवाळी 'ऑन ड्युटी'च साजरी करावी लागत आहे.दिवाळीसाठी इतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्या मिळत असल्याने सर्वांना आनंदोत्सव साजरा करता येतो. मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच रात्रीची गस्त घालून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणारे पोलिस दिवाळीत २४ तास 'ऑन ड्युटी' पहायला मिळतात. जिल्हा पोलिस दलातील ९० टक्क्याहून अधिक कर्मचारी कामावर कार्यरत असून, ते विनातक्रार जबाबदारी पार पाडत आहेत. समाजातील सर्व घटकांतून दिवाळी हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कामासाठी शहरात गेलेले नागरिक दिवाळीसाठी गावाकडे येतात. दिवाळी आली की, आप्तजणांकडे जाण्याचा ओढा सर्वांना लागलेला असतो. घरामध्ये तयार केलेल्या गोडधोड पदार्थांपासून खमंग चिवड्याचा स्वाद घेत परिवारासमवेत दिवाळी साजरी केली जाते. या धामधुमीत पोलिसांना मात्र या सणाचा आनंद घेता येत नाही. दिवाळी सण असल्याने नागरिकांची गर्दी होणार ओळखून सार्वजनिक ठिकाणी पोलिस बंदोबस्त असणे गरजेचे असते. गर्दीचा फायदा घेऊन घातपाती कारवाया किंवा चोरीसारखे गुन्हे घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांना डोळ्यात तेल घालून रांत्रदिवस बंदोबस्तासाठी थांबावे लागते. पोलिसांची संख्याबळ जितके आवश्यक आहे त्यापेक्षा कमीच संख्याबळ असते. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवरच कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्ह्यांचा तपास करणे, रात्र गस्त, चौकी सांभाळणे आदी कामे पोलिसांना करावी लागतात.
महिला पोलिसांची अडचण दिवाळीनिमित्त घरात फराळ बनविण्याचे मुख्य काम गृहिणी करतात. मात्र महिला पोलिसांना कामावरुन रजा मिळत नसल्याने वेळात वेळ काढून घरी जाऊन फराळ बनवावे लागते. शिवाय दिवाळीसाठी सून सासरी यावी, अशी सासरच्यांची इच्छा असते. मात्र कामावरुन सुटी मिळत नसल्याने सासरच्यांना समजावून सांगावे लागते. प्रसंगी नाराजी ओढावून घ्यावी लागते, अशी अडचण महिला पोलिसांची आहे. भाऊबिजेलाही हीच अडचण निर्माण होते. ही भावना समजुन घेणे गरजेचे आहे.