पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
By Admin | Updated: September 4, 2016 00:31 IST2016-09-04T00:31:19+5:302016-09-04T00:31:19+5:30
तुमसर तालुक्यातील शालेय पोषण आहारात तांदूळ वगळता इतर खाद्यपदार्थ, मसाले, हळद, मिरची पुड तेलजन्य पदार्थांचा निकृष्ठ पुरवठा करण्यात आला.

पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
तुमसर तालुक्यातील प्रकार :सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांचा समावेश
मोहन भोयर तुमसर
तुमसर तालुक्यातील शालेय पोषण आहारात तांदूळ वगळता इतर खाद्यपदार्थ, मसाले, हळद, मिरची पुड तेलजन्य पदार्थांचा निकृष्ठ पुरवठा करण्यात आला. याप्रकरणी पंचायत समितीच्या मागील मासिक सभेत चर्चा करण्यात आली. पुन्हा ८ सप्टेंबर रोजी पंचायत समितीची मासिक सभा व ९ सप्टेंबरला वार्षिक आमसभेत हा मुद्दा गाजणार आहे. तरीही निकृष्ठ दर्जाचे पोषण आहार पुरवठा होत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.
शालेय शिक्षण विभागाने वर्ग १ ते ८ करीता शालेय पोषण आहार सुरू केले आहे. बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे त्यांना कॅरीनयुक्त प्रोटीन मिळावे याकरिता विद्यार्थ्यांना शाळेतच पोषण आहार दिला जातो. मानकाप्रमाणे त्यांना आहार देण्याचा नियम आहे, तुमसर पंचायत समिती अंतर्गत शहरी व ग्रामीण भागाकरिता शालेय पोषण आहाराचा पुरवठा केला जातो.
तालुक्यात खासगी अनुदानित शाळा वर्ग १ ते ८ च्या ५३ शाळा आहेत तर जिल्हा परिषदच्या शाळा १४४ व नगरपरिषदेच्या १२ शाळा आहेत. तुमसर तालुक्यात शालेय पोषण आहाराचे लाभार्थी विद्यार्थी संख्या १२ हजार इतकी आहे.
जून, जुलै २०१६ मध्ये वर्ग १ ते ५ वाटाणा ३२८२ किलोग्रॅम, मुंगदाळ ३६७८, मटकी ३४७९ किलो गरम मसाला १८६.६०० किलो, मिरची पावडर १०२६ किलो, हळद १६० किलो, मीठ १५८२.५०० किलोग्रॅम, तेल २६०१ लिटर वर्ग ६ ते ८ ला वाटाणा ३२०९ किलो, मुंगदाळ ३५२६ किलोग्रॅम, मटकी ३३३२ किलोग्रॅम, गरम मसाला ११८.४०० किलोग्रॅम, मिरची पावडर ८४९ किलोग्रॅम, हळद १६८.६०० किलोग्रॅम, मीठ १३१६ किलो, तेल २६०८ लिटर वाटप करण्यात आले.यात मिरची पावडर प्रसाद कंपनीचे, हळद संचय कंपनीचे, तेल जीआरओ रिपाईन्ड, गरम मसाला सुविधा तर मीठ व्होली आयोडाईड कंपनीचे आहे. या कंपन्या मात्र बाजारात उपलब्ध नसल्याच्या आरोप पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपूरे यांनी केला आहे. पुरवठादाराचे देयके फक्त मागील शैक्षणिक सत्रातील मार्च २०१६ पर्यंतचे शिक्षणाधिकारी प्राथ. भंडारा यांचेकडे पावत्या व देयके तपासून पाठविण्यात आले आहेत.
तांदुळ वगळता इतर सर्व खाद्य पदार्थ, मसाले, हळद, मिरचीपुड, तेलाचा दर्जा निकृष्ठ असल्याची तक्रार पं.स. चे गटनेते नागपूरे यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत केली होती. हा मुद्दा मासिक सभेत गाजला होता.
विद्यार्थ्यांच्या पोषणाऐवजी त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे. यापूर्वी शालेय पोषण आहाराचे अधिक्षकांना निवेदन दिले होते. जिल्हास्तरावर त्यांची अजुनपर्यंत दखल घेण्यात आली नाही.
पोषण आहाराचा गुणवत्तेबाबत एकाही केंद्रप्रमुख किंवा मुख्याध्यापक यांची तक्रार नाही. पोषण आहाराबाबद समजोता केला जाणार नाही. तक्रारींची निश्चितच दखल घेवून कारवाई केली जाईल.
- जयप्रकाश जिभकाटे, अधीक्षक, पं.स. तुमसर
तांदूळ वगळता इतर खाद्य पदार्थांचा दर्जा निकृष्ठ आहे. त्याची तक्रार करण्यात आली. ८ व ९ सप्टेंबर रोजी पं.स. मासिक सभा व आमसभेत हा प्रश्न उपस्थित करू. याची तक्रार खा. नाना पटोले यांचेकडे केली आहे.
- हिरालाल नागपूरे, पं.स. गटनेते तुमसर.