आता कर्मचारी राहतील ‘नजरेत’
By Admin | Updated: January 6, 2015 22:53 IST2015-01-06T22:53:51+5:302015-01-06T22:53:51+5:30
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळा ठरवून दिल्या आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांकडून नियम पायदळी तुडविल्या जातात. याबाबत, लोकमतने ‘स्टिंग आॅपरेशन’ करून आज मंगळवारला

आता कर्मचारी राहतील ‘नजरेत’
सीईओंनी घेतली दखल : सकाळी चहाटपरीवर शुकशुकाट
भंडारा : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळा ठरवून दिल्या आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांकडून नियम पायदळी तुडविल्या जातात. याबाबत, लोकमतने ‘स्टिंग आॅपरेशन’ करून आज मंगळवारला ‘काटा दहावर तरीही शुकशुकाट’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. वृत्ताची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेऊन बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या दालनात कर्मचारी नियुक्त केला असून त्यांच्यावर साडेतीन वाजेपर्यंत निगरानी ठेवणार आहे. त्यामुळे कर्मचारी धास्तावले आहेत.
जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी शासकीय नियमावली बनविण्यात आलेली आहे. हे सर्व कर्मचारी सकाळी १० वाजता कार्यालयात उपस्थित राहून दुपारी लंच बे्रक नंतर सायंकाळी ५.४५ पर्यंत कार्यालयीन कामात उपस्थित रहावे, असे आदेश आहेत. मात्र काही कर्मचारी वगळता अनेक कर्मचारी केवळ वेळमारून नेत दिवस घालवितात. तर कित्येकदा हे कर्मचारी चहाटपरीवरच भेटतात, अशी पुष्टी जोडण्यात येत होती. यामुळे कामासाठी आलेल्यांना कर्मचाऱ्यांची ताटकळत वाट बघत रहावी लागते.
भंडारा जिल्हा परिषद कार्यालय, तुमसर, मोहाडी व लाखनी येथील पंचायत समिती व तहसील कार्यालयात स्टिंग आॅपरेशन केले. यात कर्मचारी हे सकाळी १० ला कार्यालयात उपस्थित होताना बायोमॅट्रीक मशिनवर हजेरी लावल्यानंतर कक्षात न बसता चहाटपरीवर किंवा कार्यालयाबाहेर जात होते. यात ते तासभर कार्यालयीन काम करत नसल्याचे दिसून आले. तर काही कर्मचारी हे मुख्यालयी राहत असल्याचे प्रमाणपत्र जोडत असले तरी नागपूर किंवा भंडारा येथून नित्याने जाणे येणे करणारे कर्मचारीही वेळेत कार्यालयात उपस्थित होत नसल्याचे निदर्शनास आले. या वृताने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. भंडारा जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी सकाळी चहा टपरींवर दिसून येत होते. मात्र आज सकाळी परिसरातील चहा टपऱ्या कर्मचाऱ्यांविना दिसून आल्या. त्यामुळे या परिसरात शुकशुकाट दिसून आला. या वृत्ताची मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांनी दखल घेतली.
कार्यालयाबाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी त्यांनी इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारात त्याची नोंदणी करण्यासाठी एक कर्मचारी बसविला आहे. तो दुपारी १२.३० पर्यंत नोंदणी करायचा. आजपासून हा कर्मचारी बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दुपारी ३.३० वाजेपर्यंत नजर ठेवून त्याची रजिस्टरमध्ये नोंदणी करणार आहे. याखेरीज ज्या विभागात जास्त कर्मचारी आहेत, अशांवर निगराणी ठेवण्यासाठी त्या कक्षाबाहेर स्वतंत्र रजिस्टर मध्ये नोंदणी करण्यासाठी कर्मचारी बसविणार आहेत. शिक्षण विभागातील कक्षासमोर अशा पद्धतीचा प्रकार सुरु झाला असून आज एक कर्मचारी बाहेर जाणाऱ्या येणाऱ्यांची नोंदणी करताना आढळून आला. (शहर प्रतिनिधी)