आता उरल्या केवळ पाथरीच्या आठवणी
By Admin | Updated: December 18, 2014 00:29 IST2014-12-18T00:29:32+5:302014-12-18T00:29:32+5:30
विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणामध्ये जलस्तर वाढत असून एकावेळेस गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाच्या...

आता उरल्या केवळ पाथरीच्या आठवणी
लक्ष्मीकांत तागडे गोसे/बुज.
विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणामध्ये जलस्तर वाढत असून एकावेळेस गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाच्या लढाईचे मुख्य केंद्र राहिलेले पाथरी गाव आता हळू हळू धरणाच्या पाण्यात बुडत आहे. हे बुडणारे आपले लाडके गाव पाहताना प्रकल्पग्रस्तांच्या, महिला, बाया, बापड्यांच्या डोळ्यातून अश्रृंच्या धारा वाहत असून रोजच अनेक गावकऱ्यांची पावले या बुडणाऱ्या गावाकडे पाहण्यासाठी वळत आहेत.
पण बुडणारे गाव पाहताना या गावाच्या आठवणी या कायमच्या डोळ्यात साठविल्या गेल्या आहेत. बुडणारे गाव पाहून आपोआपच डोळ्यातून पाणी पडायला सुरवात होते. प्रकल्पग्रस्त हे दृश्य पाहून मोठ्या जड अंतकरणाने आपल्या वीन गावठाणात परतात तिथे मोठ्याल्या इमारती आहेत. पण आपल्या जुन्या गावाच्या आठवणीने परत त्यांची पावले जुन्या गावाकडे वळत आहेत.
या गावाजवळून वाहणारी वैनगंगा नदी या गावाची माता होती. या नदीवर या गावातील अनेकांचा उदरनिर्वाह चालत असे. पण ही वैनगंगा नदीच आपल्याला बुडवेल असे स्वप्नात त्यांना वाटले नाही. या नदीवर बांधल्या जाणाऱ्या गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढल्यामुळे हे गाव आता बुडण्यास सुरवात झाली आहे. गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचे मुख्य केंद्र होते हे पाथरी गाव या गावातूनच प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची सुरूवात झाली. येथे अनेक आंदोलने झाले. येथे प्रकल्पग्रस्तांच्या अनेक आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. या आंदोलनामुळे प्रकल्पग्रस्त अनेक फायदे मिळाले. या गावाने आंदोलनाला अनेक लढणारे कार्यकर्ते दिले. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची रणभूमी असणारे पाथरी गाव आता बुडण्यास सुरवात झाली आहे. या गावातील गावकरी व त्यांचे दुसऱ्या गावांना राहणारे नातेवाईक या बुडणाऱ्या आपल्या गावाला शेवटचे बुडताना पाहतानी त्यांनी डोळ्यातून अश्रृंच्या धारा वाहत आहेत. या अश्रृंच्या धारा थांबवूनही थांबत नाही. आता उरल्या आहेत केवळ पाथरीच्या जुन्या आठवणी. (प्रतिनिधी)