आता पाणी बचतीसाठी महिला लोकप्रतिनिधी घेणार पुढाकार
By Admin | Updated: May 22, 2016 00:20 IST2016-05-22T00:20:42+5:302016-05-22T00:20:42+5:30
राज्याच्या अनेक भागात यंदा पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. १३२० मिलीमीटर सरासरी पाऊस पडणाऱ्या ...

आता पाणी बचतीसाठी महिला लोकप्रतिनिधी घेणार पुढाकार
निर्धार : ग्रामीण भागातूनच काम सुरू व्हायला हवे
भंडारा : राज्याच्या अनेक भागात यंदा पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. १३२० मिलीमीटर सरासरी पाऊस पडणाऱ्या भंडारा जिल्ह्यातही अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खोल गेली आहे. विहिरी कोरड्या पडल्या, हातपंप आटले, पाण्याशिवाय जीवन व्यर्थ आहे, असे म्हटल्या जाते. पाण्यासाठी महाराष्ट्रात अनेकांनी जीव गमाविले. पाण्याचे मोल जाणण्याची आता वेळ आली आहे. या दृष्टीने ‘लोकमत’ने राज्यव्यापी ‘जलमित्र अभियान’ सुरू करून या अभियानात नागरिकांना पाणी बचतीसाठी मार्गदर्शन व उपक्रम सुरू करण्याच्या उद्देशाने काम आरंभिले आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातही पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविणार आहे, त्याची सुरूवात आता नागरिकांच्या सहकार्यातून होणार आहे. यासाठी महिला लोकप्रतिनिधीशी चर्चा केली असता, त्यांनी पाणी बचतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्धार केला आहे.
पाणी बचतीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा
भंडारा जिल्ह्यात पाण्याची टंचाई नसली तरी पाण्याची बचत नागरिकांनी केली पाहिजे. उन्हाळ्यातच पाणी वाचविण्यासोबतच नेहमीसाठीच पाण्याची बचत करण्याची गरज आहे. मूलभूत सोयीसुविधा निर्माण करताना त्याचा भार सरकारी यंत्रणा, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती या यंत्रणांवर पडत असतो. अशावेळी लोकसहभागातून पाणी बचतीचे काम चांगल्या पद्धतीने होऊ शकते. पावसाळ्यात जमिनीवर पडणारे पाणी घराच्या अंगणातच विहिरीमध्ये सोडण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. ही कामे लोकसहभागातून झाल्यास यंत्रणा पुढाकार घेऊ शकते. वृक्षारोपणाचा कार्यक्रमही पावसाळ्यात हाती घेऊन त्याचे संवर्धन केल्यास पर्यावरणाचा समतोल साधला जाईल, मात्र यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.बऱ्याच लोकांकडे आरओ वॉटरसाठी यंत्रणा लावण्यात आली आहे. यात जे पाणी आपण वापरतो, त्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात पाणी हे वाया जाते. ते बकेटमध्ये साठवून त्याचा वापर भांडी धुणे, कपडे धुणे यासाठी केल्यास पाणी बचत होऊ शकते. परंतु अनेकांच्या घरी आरओ वॉटर यंत्रणेचा पाईप बेसींगमध्ये सोडून दिला जाते. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी दिवसभर वाया जाते. याचीही दक्षता घेण्याची गरज आहे.
- भाग्यश्री गिलोरकर,
अध्यक्ष, जिल्हा परिषद, भंडारा.
पाण्याचा जपून वापर करा
ज्या भागात दुष्काळ आहे तेथे २१-२१ दिवस लोक पाणी साठवून ठेवतात. आपणही याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. अनेक घरातील महिलापुरूष पहाटे फिरायला जातात. सकाळी ५ वाजता येणाऱ्या नळाची तोटी खुलीच राहते. शेकडो लिटर पाणी ते फिरून येईपर्यंत वाया जात असते. या किरकोळ बाबीवर नियंत्रण आणले तरीही पाणी बचतीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे ठरते. सार्वजनिक नळांना तोट्या पालिकेनेच लावल्या पाहिजे, ही मानसिकता अनेकांची आहे. आपल्या वार्डातला नळ आहे. आपण जर तोटी लावून ती व्यवस्थित राहिल. याची काळजी सार्वजनिक नळाबाबत घेतली. तर बऱ्याच पाण्याची बचत करू शकतो. परंतु असे होताना दिसत नाही. प्रत्येक घरी बोअरवेल दिसून येते. पाणी साठवणुकीचे काम पावसाळ्यात कुणीही करीत नाही. या पावसाळ्यात आपण पाणी बचतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. तेव्हाच भूगर्भातील पाण्याची पातळी टिकून राहील.
- स्वाती निमजे,
नगराध्यक्ष, नगरपंचायत, मोहाडी.
पाणी बचतीसाठी जागरूक व्हा
आपल्याकडे पाऊस भरपूर पडतो. टंचाई निर्माण होणार नाही. या भ्रमात नागरिकांनी राहू नये. मराठवाड्यासारखी परिस्थिती आपल्याही भागात येऊ शकते. भरमसाठ जंगलतोड होत आहे. वृक्षारोपणाचे काम त्या तुलनेत कमी आहे. किमान एका नागरिकाने पाच वृक्षाचे संगोपण करण्याचा संकल्प सोडायला हवा. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचे प्रयत्न घरोघरी व्हायला हवे. घराच्या छतावर पडणारे पाणी जमिनीत मुरवून त्याचा लाभ पाणी पातळी कायम राखण्यासाठी होऊ शकतो. शेततळे, जलयुक्त शिवार आदी योजनांच्या माध्यमातूनही जलस्तर कायम टिकविता येऊ शकतो. शेतकऱ्यांनीही या दृष्टीने नियोजन करायला हवे. नागरिकांचा सहभाग यासाठी आवश्यक आहे. पाणी बचतीचे काम जर आताच हाती घेतले तर भविष्यकाळ सुलभ होऊ शकतो. पाणी बचतीचे काम जागरूकतेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. नागरिकांनी याबाबत सदैव तत्पर असण्याची गरज आहे, अन्यथा दुष्काळ फार दूर नाही.
- नीलम हुमणे,
नगराध्यक्ष, नगरपंचायत, लाखांदूर.