आता विदर्भ राज्यासाठी लढा
By Admin | Updated: January 4, 2015 23:07 IST2015-01-04T23:07:26+5:302015-01-04T23:07:26+5:30
स्वतंत्र विदर्भाबाबत येणारे प्रत्येक सरकार केवळ आश्वासने देऊन सत्ता मिळवित असतात. त्यामुळे आणखी किती दिवस आश्वासनावर जगायचे असा प्रश्न करुन स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी

आता विदर्भ राज्यासाठी लढा
जिल्हानिहाय समिती : पत्रपरिषदेत वामनराव चटप यांची माहिती
भंडारा : स्वतंत्र विदर्भाबाबत येणारे प्रत्येक सरकार केवळ आश्वासने देऊन सत्ता मिळवित असतात. त्यामुळे आणखी किती दिवस आश्वासनावर जगायचे असा प्रश्न करुन स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी १५ फेब्रुवारीपासून सिंदखेडराजा येथून विदर्भ गर्जनायात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ जाँर्इंट अॅक्शन कमिटीचे पदाधिकारी अॅड.वामनराव चटप यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
यावेळी ते म्हणाले, तत्पूर्वी २० जानेवारीपासून जिल्हा व तालुका समितीचे गठन करण्यात येईल. विदर्भ राज्याची मागणी फार जुनी आहे. १९५३ ला झालेल्या नागपूर करारात विदर्भाचा विकास करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावेळी २३ कोटी लोकसंख्येच्या प्रमाणात २३ टक्के निधी, २३ टक्के नोकऱ्या, २३ टक्के उच्च शिक्षणाच्या सोयी आणि राज्यातील २३ टक्के मंत्री देण्याचा समावेश होता.
कृषी, खनिज, वने आदी संपदा मोठ्या प्रमाणात असूनही विदर्भाचा अनुशेष वाढतच राहिला. शेवटी विदर्भ वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. तरीही सिंचनाचा अनुशेष कायम आहे. विदर्भाच्या वाट्याचे ६० हजार कोटी रूपये पळविल्यामुळे विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले. मागील ११ वर्षात येथील ३४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. रोजगार नसल्याने तरुण नक्षलवादाकडे वळत आहेत. विदर्भाची मागणी केल्यावर दोन मराठी राज्ये नको, विदर्भ राज्य स्वतंत्र झाल्यास सक्षम राहणार नाही, असा तर्क लावला जातो. संयुक्त महाराष्ट्रात राहुनही विदर्भाच्या वाट्याला काहीच मिळत नाही. तेलंगणा राज्यापेक्षा स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी जुनी असली तरी तेलंगणा राज्य झाले आहे.
वन, खनिज शेती यांच्यावर आधारीत उद्योग नसल्याने येथील उच्चशिक्षित युवक मुंबई, पुण्याकडे धाव घेत आहेत. त्यामुळे लोकसंख्या वाढत असताना विदर्भाची लोकसंख्या मात्र कमी होत आहे. पत्रपरिषदेला राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निमंत्रक राम नेवले, अनिल तिडके, अरूण केदार ,विष्णू आष्टीकर, दुर्वास धार्मिक, अॅड. टेंभूर्णीकर, सौरभ दिवटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)