यापुढे शाळांमध्ये पर्यावरण रक्षक सेना
By Admin | Updated: July 12, 2015 00:43 IST2015-07-12T00:43:09+5:302015-07-12T00:43:09+5:30
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय हरितसेना शाळांच्या धर्तीवर प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकांनी किमान १० विद्यार्थी व विद्यार्थिनीचा गट...

यापुढे शाळांमध्ये पर्यावरण रक्षक सेना
भंडारा : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय हरितसेना शाळांच्या धर्तीवर प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकांनी किमान १० विद्यार्थी व विद्यार्थिनीचा गट ‘पर्यावरण रक्षक सेना’ म्हणून तयार करून त्याचा गटप्रमुख नेमण्याबाबत शासनाकडून शाळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. हा उपक्रम सामाजिक वनीकरण विभागामार्फत राबविला जाणार असून स्वातंत्र्य दिनी शाळा, महाविद्यालय व विद्यापीठ परिसरात किमान २० वृक्ष लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांच्यावतीने सन २०१५-१६ मधील पावसाळ्यापासून जिल्हा परिषद, नगरपरिषद व महानगरपालिका अंतर्गत शासकीय शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या आवारात २० रोपे लावून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करावयाचे आहे. या कार्यक्रमानुसार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये १५ आॅगस्ट रोजी झेंडावंदनानंतर घेण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेने सदर झाडे लावल्यानंतर त्यातील किमान ८० टक्के रोपे जिवंत ठेवण्याची व त्याचे रक्षण करून पाणीपुरवठा व कायमस्वरूपी देखभाल व संगोपणाची व्यवस्था शाळेने करावयाची आहे. केंद्र सरकारच्या हरितसेनेच्या धर्तीवर प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी दहा विद्यार्थी, विद्यार्थिनींचा गट पर्यावरण रक्षकसेना म्हणून तयार करून त्याच्या गटप्रमुखावर ही जबाबदारी द्यावयाची आहे. या कार्यक्रमात ज्या शाळांची कामगिरी उत्तम असले त्यांना प्रोत्साहन म्हणून योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर तिसऱ्या वर्षांपासून मूल्यांकन करून तालुका, जिल्हा, विभागस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस योजना, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)