अतिवृष्टीच्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 06:00 AM2019-09-14T06:00:00+5:302019-09-14T06:00:22+5:30
भंडारा तालुक्यातील यात सर्वात जास्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. पूरामुळे भंडारा जिल्ह्यातील जवळपास ८२ नदीकाठावरील गावांना पुराचा फटका बसतो. त्यात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरांसह जनावरांचे गोठेही उध्वस्त होतात. शेकडो हेक्टरातील धानपिक पाण्याखाली आल्याने पीक सडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गत आठवड्यात अतिवृष्टी झाली. यात जिल्हाभरातील शेकडो हेक्टरातील धानपीक पाण्याखाली आले आहे. परिणामी आधीच सुलतानी संकटाचा सामना करीत असलेल्या बळीराजावर अस्मानी संकटही कोसळले आहेत. अशा स्थितीत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले नाही. यामुळे सदर नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून बळीराजाला मदत देण्याची गरज आहे.
भंडारा तालुक्यातील यात सर्वात जास्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. पूरामुळे भंडारा जिल्ह्यातील जवळपास ८२ नदीकाठावरील गावांना पुराचा फटका बसतो. त्यात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरांसह जनावरांचे गोठेही उध्वस्त होतात. शेकडो हेक्टरातील धानपिक पाण्याखाली आल्याने पीक सडले आहे. विद्यमान स्थितीत काही शेतशिवारात बांध्यांमध्ये पाणी साचले असल्याने ते दृश्य पाहून शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशावेळी या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. पवनी तालुक्यातील चिचाळ परिसरातही असेच नुकसान झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात नुकसानग्रस्तांना मदत देण्यात यावी, अशी मागणी भंडारा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मंगेश हुमणे यांनी केली आहे.
याच बरोबर गाव तथा मुख्यालयाशी जोडणाऱ्या नाल्यांच्या पुलांची उंची वाढविण्याचीही गरज आहे. अतिवृष्टीमुळे भंडारा तालुक्यातील चांदोरी ते शिंगोरी मार्गावर असलेल्या पुलावर पाच दिवस पाणी असल्याने वाहतूक ठप्प पडली होती. याचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागला.
या गावांचा समावेश
भंडारा तालुक्यातील नदीकाठावर असलेल्या खैरी, कोथुर्णा, दाभा, टाकळी, माडगी, खमारी, सालेबर्डी, पिपरी, सुरेवाडा, करचखेडा, कारधा, सिरसघाट, कोरंभी, गणेशपूर, पिंडकेपार, टेकेपार, मौदी खास, जांब, ईटगाव, पागोरा आदी गावातील शेतशिवारात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठावरील गावाच्या वेशीवर असलेल्या नाल्यात जनावरेही वाहून गेली. अशामुळे पशुपालकांचे नुकसान झाले आहे. त्यांनाही मदतीची मागणी आहे. याशिवाय मोहाडी, तुमसर, लाखांदूर, साकोली, लाखनी येथेही नुकसान झाले आहे.