एनजीओसाठी जागा, ‘आर्थो’ वॉर्डसाठी जागा नाही
By Admin | Updated: June 10, 2015 00:28 IST2015-06-10T00:28:16+5:302015-06-10T00:28:16+5:30
जिल्ह्याच्या आरोग्य विभागात अनेक प्रकरणांमुळे खळबळ सुरू आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात अनेक

एनजीओसाठी जागा, ‘आर्थो’ वॉर्डसाठी जागा नाही
आकस्मिक विभागात ओपीडी : जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांसाठी जागेचा अभाव
गोंदिया : जिल्ह्याच्या आरोग्य विभागात अनेक प्रकरणांमुळे खळबळ सुरू आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात अनेक वर्षांपासून एक खासगी स्वयंसेवी संस्था एका ठिकाणी बसून आपले कामकाज पाहत आहे. मात्र रूग्णालयात आर्थो वार्डसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे रूग्णांसह चिकित्सा अधिकाऱ्यांनासुद्धा त्रास सहन करावे लागत आहे.
केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या विशाल इमारतीत आर्थो विभागासाठी (अस्थिरोग) आतापर्यंत वॉर्ड तयार करण्यात आले नाही. आकस्मिक विभागाजवळच तीन लहान कक्ष आर्थो विभागाला देण्यात आले आहेत. तेथे १२ खाटांची सोय असून ते एक दुसऱ्याला लागूनच आहेत. महिला-पुरूष रूग्णांना आजूबाजूच्या खाटांवरच ठेवले जाते. रूग्णालयात जागा उपलब्ध असतानासुद्धा आर्थो वार्डसाठी लक्ष दिले जात नाही, असे बोलले जाते. अस्थीरोगासाठी वेगळे वार्ड नसल्यामुळे रूग्णांना मोठाच त्रास सहन करावा लागतो. येथे नियुक्त अस्थीरोग विशेषज्ञांनासुद्धा आपली ओपीडी काढण्यासाठी कोणताही कक्ष देण्यात आला नाही. त्यामुळे आकस्मिक विभागात बसूनच त्यांना आपली ओपीडी काढावी लागत आहे. विशेष म्हणजे जेथे आर्थोच्या रूग्णांचा उपचार केला जातो त्याच्या अगदी समोरील भाग एका स्वयंस्वेवी संस्थेला देण्यात आला आहे. सदर स्वयंसेवी संस्था तेथे रूग्णांची तपासणी करते. त्यांचा उपचार करते व उपचाराचा सल्ला देते. सदर स्वयंसेवी संस्था रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांचे कार्य करते, मात्र शेवटी ती एक स्वयंसेवी संस्थाच आहे. या संस्थेवर कृपा दाखविण्यास हर्ज नाही, परंतु अशीच कृपा दुसऱ्या विभागांवर का दाखविली जात नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. (प्रतिनिधी)
दोन तास रूग्णाची भटकंती
६ जून रोजी सालेकसा तालुक्याच्या ब्राह्मणी येथील रहिवासी कबीरदास दमाहे (५०) रूग्णालयात उपचारासाठी पोहोचला. त्याने केटीएस रूग्णालयाच्या ओपीडी काऊंटरमधून रसीद बनविली व डॉक्टरांना दाखविले. डॉक्टरांनी त्याला भरती होण्याचे दुसरे कागदपत्र बनवून दिले. ते घेवून तो आकस्मिक वार्डात गेला. मात्र तेथे उपस्थित डॉक्टरांनी त्याला भरती करण्यास नकार दिला. त्यामुळे तो व त्याचे कुटुंबीय दोन तास डॉक्टरांच्या मागे भटकत होते. त्याला कोठे ठेवावे, ही समस्या डॉक्टरांपुढे होती. आकस्मिक वार्डाच्या बाजूच्या तीन कक्षात १२ रूग्ण भरती होते. एवढ्याच खाटा त्यांना देण्यात आल्या होत्या. आर्थो विभागात १४ रूग्ण दाखल होते. दोन रूग्णांना इतर ठिकाणी ठेवण्यात आले होते. मात्र त्या दोन रूग्णांवर तेथील डॉक्टर तसेच कर्मचारी उपचार करीत नसून त्यांच्याकडे लक्षही देत नव्हते. अशात या रूग्णाला अकारण का त्रास द्यावे? जवळपास दोन तासानंतर आधीच्या दाखल रूग्णाला सुट्टी देण्यात आली. त्यानंतर कबीरदासला दाखल करण्यात आले. कबीरदास एक आठवड्यापूर्वी अपघातात जखमी झाला होता. त्याला फ्रॅक्चर सांगण्यात आले आहे, मात्र उपचारात गैरसोय केली जात आहे.
केटीएस रुग्णालयासाठी चार वार्डांचे नियोजन करण्यात आले होते. नवीन इमारतीत तयार करण्यात आलेले चार वार्ड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरीत करण्यात आले. हे सर्व शासकीय पॉलिसीनुसार होत आहे. त्यामुळे आर्थो रुग्णांसाठी सध्या जे कक्ष आहेत, तेथेच उपचार केले जात आहे. मात्र आर्थोचे अधिक रुग्ण असले तर त्यांना इतर ठिकाणी उपलब्ध बेडनुसार हलविले जाते.
डॉ. अनिल परियाल,
निवासी वैद्यकीय अधिकारी, केटीएस रूग्णालय, गोंदिया.