पोस्ट आॅफिसला नऊ लाखांचे देयक
By Admin | Updated: June 11, 2016 00:25 IST2016-06-11T00:25:11+5:302016-06-11T00:25:11+5:30
वीज महावितरण कंपनीकडून शहरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असतानाच

पोस्ट आॅफिसला नऊ लाखांचे देयक
कारभार महावितरणचा : घरगुती वीज ग्राहकांचीही लूट
भंडारा : वीज महावितरण कंपनीकडून शहरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असतानाच आता ग्राहकांना अवाढव्य वीज देयके देण्याचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. घरगुती वीज ग्राहकांनाही याचा फटका सहन करावा लागत असतानाच भंडारा पोस्ट आॅफिसला ९ लाख रुपयांचे वीज देयके देऊन महावितरणने खळबळ उडवून दिली आहे.
भंडारा पोस्ट आॅफिसला महिन्याकाठी ३० ते ३५ हजार वीज देयके येते. परंतु या महिन्यात वीज महावितरण कंपनीने ९ लाख ३५ हजार ६९० रूपयांचे वीज देयके पाठविले आहे. ३ मे रोजी ७२६८१ इतकी रिडींग होती. ३ जून रोजी १४३०२८ रिडींग होती. ७०३४७ युनिट दाखविण्यात आले.
या युनिटचे ९ लाख ३५ हजार ६९० रूपयांचे देयक पाठविण्यात आले. हे देयक पाहताच पोस्टातील अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. वास्तविक पाहता ज्या कर्मचाऱ्याने मीटर न पाहताच रिडींग नोंदविल्यामुळे नऊ लाख रूपयांचे भरमसाठ देयक पोस्ट आॅफिसला पाठविण्यात आले.
ग्राहकांमध्ये संताप
वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याची तक्रार नोंदविण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला तर स्वत: येऊन तक्रार द्या, सोबत वीज बील आणा, असे सांगण्यात येते. मागील आठवड्यात रात्री १२ वाजता वीज पुरवठा खंडित झाला होता. १२ वाजता स्वत: जावून तक्रार कोण देईल, याचे किमान भान तरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नसावे का? असा प्रश्न वीज ग्राहकांनी केला आहे.
वीज ग्राहकांना होणाऱ्या या नाहक मनस्तापाचे निराकरण महावितरणकडून वेळीच झाले नाही तर जनतेत उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
मीटर ‘जंप’ होण्याचा प्रकार वाढला
ज्या घरगुती वीज ग्राहकांना उन्हाळ्यापूर्वी १०० ते १५० युनिटचे वीज देयके यायचे त्यांना मे महिन्यात ६०० युनिटचे वीज देयके देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. उन्हाळा असल्यामुळे १०० ते १५० युनिटचे देयके १५० ते २०० युनिटपर्यंत वाढले तर एकदाचे ग्राह्य मानता येईल. परंतु रिडींग ६०० युनिटपर्यंत वीज देयके दिल्यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मीटर ‘जंप’ होण्याचा प्रकार वाढल्यामुळे ग्राहकांना नाहक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे.
दरवाढीचा ‘शॉक’ ग्राहकांना
नोव्हेंबर २०१५ पासून तीन महिने इंधन समायोजन आकार लागू झाला होता. त्यानंतर ऊर्जामंत्र्यांनी यापुढे इंधन समायोजन आकार लागू होणार नाही, असे जाहीर केले होते. परंतु वीज ग्राहकांना अवाढव्य देयके देऊन या घोषणा फोल असल्याचे महावितरणच्या कृतीतून दिसून आले आहे. मे २०१६ मध्ये ११ टक्के इंधन समायोजन आकार लागू करण्यात आल्यामुळे सरासरी १९.५ टक्के वीज दरवाढ ग्राहकांच्या माथी मारण्यात आली आहे.