स्मशानभूमीत रंगली ‘कवितेची एक रात्र’
By Admin | Updated: April 28, 2015 00:29 IST2015-04-28T00:29:38+5:302015-04-28T00:29:38+5:30
स्मशाने, प्रेतयात्रा, सरण रचणे, शोक विलाप हे कवितेचे पारंपरिक विषय असले तरी प्रत्यक्ष स्मशानभूमीतच कविमित्रांनी एकत्र येवून ...

स्मशानभूमीत रंगली ‘कवितेची एक रात्र’
रसिकांची उत्स्फूर्त दाद : परजिल्ह्यातील कवी व रसिकांची लक्षणीय उपस्थिती
भंडारा : स्मशाने, प्रेतयात्रा, सरण रचणे, शोक विलाप हे कवितेचे पारंपरिक विषय असले तरी प्रत्यक्ष स्मशानभूमीतच कविमित्रांनी एकत्र येवून रात्रीच्या वेळेला कविसंमेलन रंगविणे ही बाब अत्यंत निराळी व अभिनवच मानली पाहिजे. जनमानसात स्मशानभूमीविषयी भीतीची भावना आहे. समाजातील ही भावना काही प्रमाणात कां होईना? नाहीशी करण्याच्या सांस्कृतिक हेतूने भंडारा येथील युगसंवाद वाड:मयीन सांस्कृतिक चळवळ आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भंडारा शाखेने वैनगंगा नदीच्या काठावरील स्मशानभूमी परिसरात शनिवारी रात्री कविसंमेलनाचे प्रबोधनपर आयोजन केले होते.
या काव्य मैफलीच्या अध्यक्षस्थानी गझलकार प्रल्हाद सोनेवाने होते. अतिथी म्हणून कवी ह.रा. मोहतुरे, सी.एम. बागडे आणि अमृत बन्सोड हे उपस्थित होते. या मैफलीचे संचालन डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी केले.
कविसंमेलनाच्या प्रारंभी मराठीचे ज्येष्ठ लेखक स्व. ना.रा. शेंडे यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून त्यांचे कृतज्ञ भावस्मरण करण्यात आले. कविसंमेलनात सर्वप्रथम डॉ. उमेश बन्सोड यांनी ‘मरणावर बोलू काही’ याच शिर्षकाची गझल सादर केली. या कविसंमेलनात सर्व उपस्थित कवींच्या कविता ‘मृत्यू’ या आशयाच्याच अविष्कार करणाऱ्या होत्या.
या अभिनव कविसंमेलनात डॉ. गिरीश सपाटे, पवन कामडी, प्रमोदकुमार अणेराव, दयाराम बगमारे, महेश रोकडे, तुळशीदास चौधरी, जयकृष्ण बावनकुळे, गजेंद्र गजभिये, रेवाराम खोब्रागडे, दिनेश पंचबुद्धे, शीलवंत मडामे, सी.एम. बागडे, विनोद मेश्राम, वामन शेळमाके, ह.रा. मोहतुरे, नामदेव कान्हेकर, राहुल तागडे, मनोज केवट, मार्कंड नंदेश्वर, आसाराम शहारे, आलोक केवट, आशिष रंगारी, सुमंत रहाटे, डोमा कापगते, दिवाकर मोरस्कर, नरेश आंबिलकर आदी कवींच्या मृत्यूसंवेदनपर कवितांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
कविसंमेलाचे अध्यक्ष प्रल्हाद सोनेवाने यांनी मृत्यू संकल्पनेचा विविध प्रतिभा प्रतिमांनी वेध घेणारी एक आशयसमृद्ध गझल सादर करून या काव्य मैफलीचा उत्कर्ष साधला.
या कविसंमेलनास महाविद्यालयीन युवकांसह रसिक मंडळींची लक्षणीय उपस्थिती होती. या कविसंमेलनात भंडारा शहरासोबतच लाखनी, साकोली, गोंदिया, लाखांदूर, पवनी आणि रामटेक येथील कवी व रसिक उपस्थित झाले होते.
प्रारंभीचे प्रास्ताविक डॉ. अनिल नितनवरे यांनी तर आभारप्रदर्शन अंनिसचे विष्णुदास लोणारे यांनी केले. कविसंमेलनासाठी प्रा.नरेश आंबिलकर, प्रमोदकुमार अणेराव, अमृत बन्सोड, डॉ. प्रदीप मेश्राम, प्रा. जगजीवन कोटांगले, आसित बागडे, गुलशन गजभिये, दा.इ. प्रधान, बासप्पा फाये, प्रा. डॉ. जयश्री सातोकर, दिनेश कोटांगले, दिनेश बडवाईक यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)