लाखांदूर तालुक्याला साठवण बंधाऱ्यांची गरज
By Admin | Updated: May 3, 2016 00:42 IST2016-05-03T00:42:06+5:302016-05-03T00:42:06+5:30
पावसाचे पाणी न अडता सरळ नदीतून वाहून जाते. तर नाल्यावर लाखो रुपये खर्चून बांधलेले सिमेंट नाला बांधकाम पाणी अडविण्यास असमर्थ ठरत आहेत.

लाखांदूर तालुक्याला साठवण बंधाऱ्यांची गरज
प्रशासन लक्ष देणार का? : शिव मंदिर परिसरात पूल-कम बंधाऱ्याचे नियोजन!
लाखांदूर : पावसाचे पाणी न अडता सरळ नदीतून वाहून जाते. तर नाल्यावर लाखो रुपये खर्चून बांधलेले सिमेंट नाला बांधकाम पाणी अडविण्यास असमर्थ ठरत आहेत. गरज आहे चुलबंद नदीवर पूल कम बंधाऱ्याची. मागिल अनेक वर्षाची ही मागणी पूर्ण झाल्यास तालुक्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. हेही तितकेच खरे आहे.
उन्हाळा आला की शासन स्तरावर पाणी टंचाईच्या बोंबा मारत पंचायत समितीचे कर्मचारी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन आराखडा तयार करतात. त्यासाठी दरवर्षी लागणारा खर्च, एकुणच तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रशासनाचा प्रकार ग्रामपंचायत सचिव, सरपंचाकडून दिसून येतो.
तालुक्यात जवळपास ६३ ग्रापंचायती व ७९ गावे आहेत. माहिती नुसार आतापर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीना पिण्याच्या पाण्याच्या सुविधेकरिता नळयोजनेच्या माध्यमातून लाखोचा निधी प्राप्त झाला, खर्चही झाला. पाण्याचा स्रोत शोधून काढ्ण्यासाठी जिल्हा परिषदेचा स्वतंत्र विभाग असताना एकदम उन्हाळा लागताच नळयोजना बंद पडतातच कशा, म्हणजेच कागदी घोडे नाचवुन पाण्याचा स्रोत शोधतात का असा प्रश्न नक्कीच उपस्थीत होतो. पावसाचे पाणी अडविण्यासाठी ग्रामपंचायत किवा प्रशासनाकडुन कोणताच प्रयत्न केला जात नाही. मात्र बंधारे बांधण्यासाठी कोट्यवधीच्या निधिची उधळपट्टी केली जाते. तालुक्याला वैनगंगा व चुलबंद नदीचे वरदान आहे. तालुक्याच्या मधून ह्या दोन्ही नद्या वाहत असताना पाणी टंचाईवर मात करण्यासाठी या नद्याच्या उपयोग करुन घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडुन केला गेला नाही. उलट धर्मापुरी, चिचोली, आसोला, सोनी येथील नदीपात्रात वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात लाखो रुपये खर्च करुन रपटे बांधले जातात. हा अनावश्यक खर्च टाळून एकदाच चुलबंद व वैनगंगा नदीवर पुल कम बंधाऱ्याचे बांधकाम केल्यास मोठ्या प्रमाणात पाणी अडेल, आपोआपच पाण्याची पातळी वाढेल, पाणी टंचाईच प्रश्न निर्माण होणार नाही.
चुलबंद नदीवर बोथली, चिचोली, लाखांदूर शिवमंदिर व सोनी, तर वैनगंगा नदीवर मोहरणा, आवळी येथे पुल कम बंधारे गरजेचे आहेत, परंतु अद्याप याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. लाखांदूर येथील शिव मंदिर परिसरात पुल कम बंधारा बांधकाम करण्यासाठी नगरपंचायतीने ठराव घेऊन शासनाकडे पाठवल्याची माहिती हाती आली आहे. दोन्ही नदीवर पूल कम बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यास पाणी टंचाईवर नक्कीच आळा बसेल. (तालुका प्रतिनीधी)