बोगस लाभार्थ्यांवर प्रशासनाच्या कारवाईची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:36 IST2021-04-20T04:36:43+5:302021-04-20T04:36:43+5:30
मोहाडी तहसीलदारांनी शाळेचे मुख्याध्यापक व तलाठ्यांमार्फत ६५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींचा शोध प्रत्येक गावातील शाळेच्या जन्माच्या दाखल खारीज नोंदवहीतून ...

बोगस लाभार्थ्यांवर प्रशासनाच्या कारवाईची गरज
मोहाडी तहसीलदारांनी शाळेचे मुख्याध्यापक व तलाठ्यांमार्फत ६५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींचा शोध प्रत्येक गावातील शाळेच्या जन्माच्या दाखल खारीज नोंदवहीतून तारखेसह पडताळणी करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. यामुळे बोगस श्रावणबाळ व वृद्धापकाळ लाभार्थ्यांवर आता कारवाई होणार आहे. यात अनेक बोगस लाभार्थी तत्कालीन डॉक्टर व राजकारण्यांचे हितसंबंध चव्हाट्यावर येणार आहेत. मोहाडी तालुक्यात श्रावणबाळ व वृद्धापकाळ योजनेत मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थ्यांचा भरणा असल्याची ओरड मागील पाच ते सात वर्षांपासून सातत्याने होत आहे. तत्कालीन डॉक्टरांनी ४० ते ५५ वर्षांच्या व्यक्तींकडून चिरीमिरी घेऊन बोगस प्रमाणपत्र दिल्याने समस्येत वाढ झाली. तहसील कार्यालयात कार्यरत समित्यांनी या संधीचे सोने करीत आपल्या कार्यकर्त्यांना व जवळचे नातेवाईक, समर्थकांना खूश केले. अनेकांनी आपले भाग्य आजमाविले. परंतु, या सर्व प्रकारांमुळे खरे लाभार्थी मात्र योजनेपासून वंचित राहिले.