नाव वाघाचं, प्रकरण प्रेमाचं !
By Admin | Updated: June 11, 2016 00:26 IST2016-06-11T00:26:50+5:302016-06-11T00:26:50+5:30
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली एक विवाहिता जंगलातून अचानक गायब झाली. त्यानंतर वाघाने खाल्ल्याची अफवा पसरविण्यात आली.

नाव वाघाचं, प्रकरण प्रेमाचं !
नवरगाव येथील घटना : विवाहितेचे तरुणासोबत पलायन
अड्याळ/चिचाळ : तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेली एक विवाहिता जंगलातून अचानक गायब झाली. त्यानंतर वाघाने खाल्ल्याची अफवा पसरविण्यात आली. तब्बल १५ दिवसांनंतर ही विवाहिता प्रियकरासोबत पळून गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. प्रेमासाठी वाटेल ते करण्याचा हा प्रकार नवरगाव येथे उघडकीस आला आहे.
पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरगाव जंगलात ३६ वर्षीय विवाहित महिला तेंदूपत्ता संकलनासाठी गेली होती. त्याठिकाणी तिचा प्रियकर तिची वाट पाहत बसलेला होता. तिला पळून जायचे असल्यामुळे तिने वाघ-वाघ असा आरडाओरड केली. त्यामुळे तिच्यासोबतच्या असलेल्या महिला मजुरांनी तिथून धूम ठोकली. त्यानंतर तिचा पती कवडू गणवीर यांनी अड्याळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी नागरिक, पोलीस व वनविभागाचे कर्मचाऱ्यांना जंगल पिंजून काढले असता तिचे कपडे आढळून आले.
मात्र वाघाने ठार केल्याच्या कुठल्याही खुणा ठाणेदार अजाबराव नेवारे, उपनिरीक्षक विठ्ठल मोरे व अड्याळचे वनक्षेत्राधिकारी प्रमोद महेशपाठक, पवनीचे लागवड अधिकारी भाग्यश्री पोले यांना दिसून आल्या नाही.
त्या पे्रयसी महिलेला दोन अपत्ये आहेत. त्यांच्या घरी नीलेश वैद्य (२९) या तरुणाचे येणे-जाणे होते. दरम्यान नीलेश व महिलेत प्रेमसंबंध जुळून आले. काही दिवसापूर्वी दोघांनी योजना आखून जंगलातून सुवर्णाला वाघाने खाल्याची अफवा पसरवून ते दोघेही पळून गेले असावी, अशी चर्चा गावात सुरू झाली.
त्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनात पाच लोकांचे पथक तयार करून अड्याळचे उपनिरीक्षक विठ्ठल मोरे, हवालदार सतदेवे, महिला पोलीस टेंभुर्णे, पोलीस शिपाई बनकर व नवरगावचे पोलीस पाटील यांना गोपणीय माहितीवरुन नाशिकला पाठविण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील कोटांगगाव येथे गवताच्या झोपडीत त्यांनी संसार थाटला होता.
पोलीस आपल्या मागावर असल्याची त्यांना भनकही नसतांना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडून अड्याळला येथे आणले. शुक्रवारला अड्याळ पोलीस ठाण्यात तिला व तिचा प्रियकर नीलेश बालकदास वैद्य याला हजर केले असता त्या दोघांनी पळून गेल्याची कबुली दिली. (वार्ताहर)