नजरा नगराध्यक्ष आरक्षण सोडतीकडे
By Admin | Updated: September 28, 2016 00:34 IST2016-09-28T00:34:38+5:302016-09-28T00:34:38+5:30
डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत मुदती संपणाऱ्या नगर परिषदा व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक ...

नजरा नगराध्यक्ष आरक्षण सोडतीकडे
नगर परिषद निवडणूक : यापूर्वीच्या आरक्षणाची माहिती प्रशासनाकडून शासनाकडे सादर
भंडारा/पवनी : डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत मुदती संपणाऱ्या नगर परिषदा व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका भयमुक्त वातारणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. या परिपत्रकात एक सदस्यीय प्रभाग पद्धती ऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती व नगर परिषदाच्या नगराध्यक्षाची निवड थेट जनतेमधून करण्याची पद्धती लागू करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वीचे आरक्षण कोणत्या प्रवर्गाला होते, महिला की पुरूष, अनुसूचित जाती की जमाती, मागासवर्गीय की सर्वसाधारण यासंबंधीची माहिती महिनाभरापूर्वीच जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सादर केली आहे. मागील अनेक दिवसांपासून जनतेमधून नगराध्यक्ष निवडला जाईल, ही चर्चा होती. परंतु त्यावर निर्णय झाला नव्हता. त्यामुळे संभ्रम होता. आता जनतेमधून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याचे पत्र प्रशासनाला प्राप्त झाल्यामुळे नगरसेवकांमधून नगराध्यक्ष या चर्चेला विराम मिळाला आहे.
नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडला जाणार असल्याने सर्वच राजकीय पक्षात उमेदवार कोण राहील? ही चर्चा शिगेला पोहोचली आहे. परंतु नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होईल, यासंबंधीचे रोस्टर (आरक्षण सोडत) जाहीर झाल्याशिवाय आताच तर्क बांधणे कठिण होत आहे. त्यामुळे राजकीय पक्षानी प्रवर्गनिहाय नावांची चाचपणी सुरू केलेली आहे. सर्वसाधारण जागेसाठी सर्व पक्षांकडे ईच्छुकांची गर्दी असली तर राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांच्या निश्चिती करीता पक्षप्रवेश करून उमेदवारी देण्याची वेळ बहुतांश राजकीय पक्षावर येण्याची शक्यता आहे.
थेट जनतेमधून निवडून जाण्यासाठी आरक्षण सोडत काढण्यापूर्वीच काहींनी स्वत:च्या नावाची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये पेरलेली आहे. काही उमेदवार नगरसेवक किंवा नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी बाशिंग बांधून तयार असले तरी सर्वांनाच आरक्षण सोडतीची प्रतीक्षा लागली आहे. (प्रतिनिधी/तालुका प्रतिनिधी)
जेवणावळीवर भर सुरूच
नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या शर्यतीत अनेकांनी फिल्डींग लावलेली असून सप्टेंबर महिन्यात झालेल्या जन्माष्टमी आणि गणपतीच्या काळात ईच्छुकांनी जेवनावळीवर भर दिला होता. याशिवाय बैल पोळा व तान्हा पोळ्याचे आयोजन यावर्षी मोठ्या प्रमाणात दिसून आले होते. त्यामुळे शुभेच्छांचे बॅनर्स लावण्यात आले होते. आताही शहरात मोठ्या प्रमाणावर हे बॅनर्स दिसत आहेत. हा सर्व खटाटोप सुरू असताना नगराध्यक्षपद आरक्षण सोडत जाहीर होत नसल्यामुळे याकडे नजरा खिळून आहेत.