लग्नाच्या दिवशी नवरदेवाची मस्टरवर हजेरी
By Admin | Updated: June 14, 2014 23:20 IST2014-06-14T23:20:20+5:302014-06-14T23:20:20+5:30
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या एका तरुणाची लग्नाच्या दिवशी मस्टरवर हजेरी लावण्यात आल्याची धक्कादायक बाब आलेसूर येथे माहिती अधिकारात उघडकीस आली आहे.

लग्नाच्या दिवशी नवरदेवाची मस्टरवर हजेरी
प्रकरण मग्रारोहयोचे : माहिती अधिकारात प्रकरण उघडकीस
तुमसर : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या एका तरुणाची लग्नाच्या दिवशी मस्टरवर हजेरी लावण्यात आल्याची धक्कादायक बाब आलेसूर येथे माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. आलेसूर येथे रोजगारानिमित्त बाहेरगावी राहणारे गावात असून कामावर न जाणाऱ्यांचीही नावे मस्टरवर आहेत. परंतु या अनियमिततेप्र्रकरणी तुमसर पंचायत समिती व जिल्हा प्रशासन गप्प आहे.
तुमसर तालुक्यातील आलेसूर या आदिवासीबहुल गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दि. ११ मार्चपासून कामे सुरु झाली होती. या कामावर २५० ते ३०० मजूर होते. यापैकी ४० ते ५० मजुरांची नावे बोगस असल्याची माहिती आहे. दिनदयाल नरकंडे यांच्या शेतापासून ते टीसीएम नाली बांधकाम, पांदन नवीन रस्ता, माती खोदून रस्त्यावर टाकणे या कामांचा समावेश होता. आलेसूर या गावाची लोकसंख्या १,५०० असून ही गटग्रामपंचायत आहे.
आलेसूर येथील गिरीधर देवलू सुखदेवे या तरुणाचे लग्न दि. २३ मार्च २०१४ ला मिटेवानी येथील मंगला लक्ष्मण मासुरकर हिचेशी होते. लग्नाची वेळ सकाळी ११ वाजता होती. परंतु त्या दिवशी हा युवक आलेसूर येथील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमीच्या कामावर हजर होता. मस्टरवर त्याची उपस्थिती दाखविण्यात आली. सहकाऱ्याचे लग्न असल्याने अन्य मजूरही लग्नाला गेले हे निश्चित आहे.
येथे नवरदेवाचेच नाव मस्टरवर आहे तर दुसऱ्या मजुराचे नाव निश्चितच असणार हे नाकारता येणारे नाही. या गावातील सहा ते सात जण रोजागरानिमित्त बाहेर गेले आहेत. कारखान्यात काम करणारे, जलवितरण प्रणालीचे कामे करणारे, ट्रक चालविणे, म्हशी राखणे यानिमित्त बाहेर आहेत. त्यांची नावेसुद्धा मस्टरवर नियमित सुरु होती. त्यांची मजुरी राष्ट्रीयकृत बँकेतून होते.
येथे नियमित कामावर जाणाऱ्या मजुरांना केवळ ७० ते ८० रुपये मजुरी मिळत होती. जे कामावरच गेले नाहीत त्यांना मात्र ८० ते १०० रुपये मजुरी मिळाली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर दि. ९ जूनपासून कामे बंद करण्यात आली आहेत.
या ठिकाणी कामावर सद्यस्थितीत केवळ १५ ते २० मजूर आहेत. पावसाळा सुरु होत असल्याने कामे बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात पारदर्शकता व अनियमिततेबाबत कारवाई होते. परंतु येथे गंभीर प्रकार उघडकीस आल्यावरही पंचायत समिती व जिल्हा प्रशासन गप्प आहे. हजेरी घेण्याकरिता ग्रामरोजगार सेवक असतो. परंतु शासकीय कर्मचारी ग्रामसेवकाने कर्तव्यात कसूर केला आहे. (तालुका प्रतिनिधी)