मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविणार
By Admin | Updated: June 1, 2015 01:08 IST2015-06-01T01:08:32+5:302015-06-01T01:08:32+5:30
सधन कृषी पध्दतीत मृद आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृद तपासणीवर आधारित खतांच्या संतुलित तसेच परिणामकारक वापरास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविणार
भंडारा : सधन कृषी पध्दतीत मृद आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृद तपासणीवर आधारित खतांच्या संतुलित तसेच परिणामकारक वापरास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी केंद्र शासनाने मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी मृद आरोग्य पत्रिका अभियानात निवड करण्यात आलेल्या गावांची माहिती संबंधित कृषी अधिकारी यांचेकडून प्राप्त करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक तीन वषार्नंतर त्याच्या शेताची मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन दयावयाची आहे. यामध्ये आगामी तीन वर्षाच्या कालावधीत राज्यातील सर्व गावांची टप्प्याटप्प्याने निवड करुन तीन वर्षात राज्यातील सर्व शेतकऱ्यांना जमिन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून त्याच्या जमिनीचा रासायनिक गुणधर्म, स्थिती प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सुक्ष्म मूलद्रव्य कमतरता या स्थितीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीकरिता केंद्र शासनाचा ७५ टक्के व राज्य शासनाचा २५ टक्के आर्थिक सहभाग राहणार आहे. या योजनेचे प्रमुख उद्देश रासायनिक खतांचा अर्निबंध वापर कमी करुन मृद तपासणीवर आधारित अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे. मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रिय खते, गांडुळ खत, सल्फर आच्छादित युरिया सारख्या संथ गतिने नत्र पुरवठा करणाऱ्या खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे. क्षमता, वृध्दी, कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आणि भारतीय कृषी संशोधन अनुसंधान/ राज्यातील कृषी विद्यापीठांशी सुसंगत सहभागाने मृद तपासणी प्रयोगशाळांच्या कार्यपध्दतीत सुधारणा घडवून आणणे. जमिनीच्या उत्पादकतेविषयीच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यांमध्ये मृद नमुने काढण्याच्या व तपासणीच्या पध्दतीमध्ये समानता आणणे व निर्धारित जिल्ह्यांमध्ये तालुका/ परिमंडळ स्तरीय खतांच्या शिफारशी विकसित करणे. जिल्हयातील एकूण लागवडीखालील क्षेत्र, त्यापैकी बागायती क्षेत्र व जिरायत क्षेत्र व त्यानुसार बागायती क्षेत्रातून २.५० हेक्टर क्षेत्रामधून एक नमुना तर जिरायत क्षेत्रामधून १० हेक्टर क्षेत्रातून एक नमुना या प्रमाणे नमुने काढण्यात येणार असून सन २०१५-१६ या वर्षात एकूण २८० गावातून १७ हजार १२७ नमुने काढण्यात येणार आहेत. (नगर प्रतिनिधी)