भाजपात उमेदवारीसाठी सर्वाधिक रस्सीखेच
By Admin | Updated: June 10, 2014 23:51 IST2014-06-10T23:51:54+5:302014-06-10T23:51:54+5:30
साकोलीचे आमदार आता खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण राहील, याबाबत मतदारांमध्ये कमालिची उत्सुकता आहे. मागील तीन टर्म आमदार असलेले पटोले हे यावेळी कुणबीबहुल समाजातील

भाजपात उमेदवारीसाठी सर्वाधिक रस्सीखेच
संजय साठवणे -साकोली
साकोलीचे आमदार आता खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण राहील, याबाबत मतदारांमध्ये कमालिची उत्सुकता आहे. मागील तीन टर्म आमदार असलेले पटोले हे यावेळी कुणबीबहुल समाजातील एखाद्या कार्यकर्त्याला ‘प्रोजेक्ट’ करतात की पक्षातील अन्य समाजातील निष्ठावंत पदाधिकाऱ्यावर मर्जी राखतात, हे पाहणे मजेचे ठरणार आहे. असे असले तरी भाजपची उमेदवारी पटोले यांच्या पुढाकारानेच मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
लोकसभा निवडणुकीमधील दणदणीत विजयामुळे भाजपमध्ये उत्साही वातावरण आहे. जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांपैकी साकोली क्षेत्रासाठी भाजपात सर्वाधिक ईच्छूक आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना कुणी दुखावू नये, सामाजिक समिकरणातील संतुलन, अशा सर्वच बाजूने पक्षश्रेष्ठीला विचार करावा लागणार आहे.
२००९ च्या परिसीमनापूर्वी लाखांदूर आणि साकोली असे दोन स्वतंत्र मतदारसंघ होते. या दोन्ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होत्या. लाखांदुरात नाना पटोले तर साकोलीत सेवक वाघाये यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर दोन टर्म निवडणूक जिंकली होती. परिसीमनानंतर हे दोन्ही मतदारसंघ एक झाले. त्यापूर्वीच नाना पटोले भाजपात गेले. पटोलेंनी ही निवडणूक भाजपकडून तर सेवक वाघाये यांनी काँग्रेसकडून लढली. यात पटोले हे राज्यातून सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले होते.
२०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवून संसदेत दाखल झाले आहेत. त्यांना साकोली विधानसभा क्षेत्रात ४८ हजारांचे मताधिक्य आहे. त्यामुळे या मतदार क्षेत्रात काँग्रेसमधून पुन्हा सेवक वाघाये यांना उमेदवारी मिळते की, ही जागा राष्ट्रवादीला मिळते यावर मंथन सुरू आहे. ही जागा काँग्रेसकडे राहिल्यास पुन्हा एकदा सेवक वाघाये यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांचा पराभव झाल्यामुळे ते विधानसभा निवडणुकीत पुढाकार घेतात का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मिळाली तर सुनिल फुंडे यांचे नाव समोर आहे. ही जागा कुणालाही मिळाली तरी आपण निवडून येऊ शकतो का? अशी धास्ती आतापासूनच काँग्रेस - राकॉ आघाडीतील ईच्छुकांमध्ये निर्माण झाली आहे. या मतदारसंघात कुणबी, तेली, कोहळी समाजाचे प्राबल्य असून आघाडी आणि युतीतून याच समाजाील इच्छुकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आता कोणता पक्ष कोणत्या समाजाला जवळ करतो, हे लवकरच दिसेल.