कोरोनाच्या लढाईत ग्रामीण भागातील माऊली सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:51+5:30
लॉकडाऊनच्या काळात आपल्या संसाराचा गाडा हाकत तालुक्यातल्या ग्रामीण भागातील माय-माऊली, भगिनी मास्कची निर्मिती करताना दिसत आहेत. सारे काही ठप्प असताना महाराष्ट्र शासनाची जिवनोन्नोती अभियान 'उमेद'च्या ५३ महिला समूहाच्या माध्यमातून लक्षावधी रूपयांची उलाढाल होताना दिसत आहे. कोरोनाशी दोन हात करण्यास बचत गट महत्त्वाची भूमिका तर बजावत आहेतच शिवाय, त्यांच्या हाताला देखील काम मिळाले आहे.

कोरोनाच्या लढाईत ग्रामीण भागातील माऊली सक्रिय
राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोना आला आणि लॉकडाऊनची घोषणा झाली. केवळ चार तासात चित्र बदलले. आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मास्क, सॅनिटायझरला बाजारात मागणी वाढली. काहींनी तर यामध्ये देखील संधी शोधत काळाबाजारही केला. अव्वाच्या सव्वा भाव लावत आपली झोळी भरायला सुरूवात केली. मात्र मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा चा प्रश्न उभा ठाकला असताना ‘उमेद’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील माय माउलींनी मास्क तयार करत कोरोनाच्या या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
लॉकडाऊनच्या काळात आपल्या संसाराचा गाडा हाकत तालुक्यातल्या ग्रामीण भागातील माय-माऊली, भगिनी मास्कची निर्मिती करताना दिसत आहेत. सारे काही ठप्प असताना महाराष्ट्र शासनाची जिवनोन्नोती अभियान 'उमेद'च्या ५३ महिला समूहाच्या माध्यमातून लक्षावधी रूपयांची उलाढाल होताना दिसत आहे. कोरोनाशी दोन हात करण्यास बचत गट महत्त्वाची भूमिका तर बजावत आहेतच शिवाय, त्यांच्या हाताला देखील काम मिळाले आहे. या साº्या घडामोडींमध्ये आणि उलाढालींमध्ये जिल्ह्यात तुमसर तालुका अव्वल ठरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले आणि त्यानंतर मास्कची कमतरता भासू लागली. पण, या कठीण आणि कसोटीच्या काळात देखील 'उमेद'च्या ५३ समूह महिला सदस्यांनी तब्बल ५७०० मास्क तयार केले, तर ४५० सॅनिटायझरच्या बाटल्या तालुक्यातील सिहोरा परिसरातील सर्व औषधे दुकान, ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या माध्यमातून अगदी कमी किमतीत विक्री करण्यात आली आहे. शिवाय, अजूनदेखील हजारो मास्कची गरज असून ते देखील आगामी काळात उमेदच्या माध्यमातून पुरवली जाणार आहे. जिल्ह्यात मास्कची सक्ती करण्यात आली असली तरी मेडीकल स्टोर्समध्ये मास्क उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. मास्कचा तुटवडा लक्षात घेता नागरिक तोंडावर रुमाल बांधत आहेत. ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियाना अंतर्गत त्या माय माऊल्या गावागावांत फिरून रांगोळीच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करून नागरिकांनी घ्यावयाची दक्षता व स्वच्छतेविषयी माहिती देण्याचे कार्य पी. टी. बिसेन, महेश बडवाईक, सुरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.