मोहाडीत पाणी प्रश्न पेटणार
By Admin | Updated: April 25, 2016 00:29 IST2016-04-25T00:29:54+5:302016-04-25T00:29:54+5:30
सध्या मोहाडीत तीव्र पाणी टंचाईची समस्या उद्भवली असुन नळाला एक दिवसा आडही पुरेपूर पाणी मिळत नसल्याने ..

मोहाडीत पाणी प्रश्न पेटणार
टँकरने पाणीपुरवठा करा : नगरसेवकांची मागणी
मोहाडी : सध्या मोहाडीत तीव्र पाणी टंचाईची समस्या उद्भवली असुन नळाला एक दिवसा आडही पुरेपूर पाणी मिळत नसल्याने तसेच राजेंद्र वॉर्ड क्र. ७ च्या मध्यभागी उन्हाळ्यात चार महिने तर नळाला एक थेंबही पाणी येत नसल्याने नागरिकांच्या सोयीसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागण नगरसेवक रविकांत देशमुख यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली असून मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारासुध्दा दिला आहे.
मोहाडीनगरात पाण्याच्या टाक्या टिळक वॉर्ड, इंदिरा वॉर्ड व सुभाष वॉर्ड या गावाबाहेरील वॉर्डातील जागेत बनविलेल्या असल्याने तसेच शहराचा सर्वात जुना राजेंद्र वॉर्ड हा मध्यभागी असल्याने या वॉर्डात नळाचे पाणी योग्य प्रमाणात कधीही मिळत नाही. वॉर्ड क्र. ६, ७ व ८ या भागातील मध्यवस्तीत पाण्याची मोठीच टंचाई असते. राजेंद्र वॉर्डातील संत कबीर चौक ते पातरे आरामशीन या रस्त्यावरील घरांना उन्हाळ्यात दरवर्षी चार महिने नळाला एक थेंबही पाणी येत नाही. मात्र नळ बिल वर्षभराचा वसुल केला जातो. त्यामुळे या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक रविकांत देशमुख यांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी नगरपंचायत मोहाडी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला असून येथील अनेक नागरिकांनीही पाठिंबा दिलेला आहे. टँकरसेवा केव्हा सुरु होते याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)