‘त्या’ तिघांच्या मृत्यूवरुन मोहाडीत वातावरण संतप्त
By Admin | Updated: June 15, 2014 23:22 IST2014-06-15T23:22:39+5:302014-06-15T23:22:39+5:30
भारतभ्रमणासाठी मोहाडी तालुक्यातून आठ सुमोमध्ये गेलेल्या वाहनांपैकी एका वाहनाचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. मृतदेह सोबत घेऊन सर्वच जण मोहाडीला परत येण्याची गरज असताना

‘त्या’ तिघांच्या मृत्यूवरुन मोहाडीत वातावरण संतप्त
मोहाडी : भारतभ्रमणासाठी मोहाडी तालुक्यातून आठ सुमोमध्ये गेलेल्या वाहनांपैकी एका वाहनाचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. मृतदेह सोबत घेऊन सर्वच जण मोहाडीला परत येण्याची गरज असताना रुग्णवाहिकेतून मृतदेह पाठवून अन्य सहकारी पुढच्या प्रवासाला निघून गेल्यामुळे मोहाडीत वातावरण संतप्त झाले आहे.
स्थानिक बहुउद्देशिय परमात्मा एक सेवक मंडळाच्या सर्व संचालकांविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलाच्या मोहाडी शाखेने दिला आहे.
बहुउद्देशिय परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीच्या मार्गदर्शिका लता बुरडे यांच्या अंगात बाबा जुमदेवजी येतात व ते सत्यबोल सांगतात, अशी बतावणी करून या मंडळाच्या हजारो सेवकांना संमोहित करण्यात आले. त्यामुळे तिने सांगितलेला शब्द पाळण्यासाठी हजारो सेवक तत्पर असतात. तुम्हाला आपले दु:ख, गरीबी व आजार दूर करायचे असतील तर तुम्हाला भारतभ्रमण करावे लागेल असे तिने सांगितल्यावर ७० ते ८० सेवक भारतभ्रमणासाठी तयार झाले. यासाठी प्रत्येक सेवकाकडून १४ हजार रुपये घेण्यात आले. हे सर्व सेवक २१ मे रोजी मोहाडी येथून भारत भ्रमणासाठी निघाले. दि.७ जूनला त्यांच्या वाहनापैकी एका सुमो वाहनाला राजस्थानातील उदयपूरजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. यात दोन जण जखमी झाले. एवढा मोठा अपघात होऊनही मृतकांच्या परिवाराला दुसऱ्या दिवशी अर्धवट माहिती देण्यात आली. तसेच त्या मृतकांना व जखमींना तिथेच सोडून लता बुरडे व अन्य सहकारी पुढच्या प्रवासाला गुजरातला निघून गेले. या सहलीचे आयोजक लता बुरडे व नवीन भैसारे यांच्याशी मृतकांच्या कुटुंबीयांनी संपर्क करून माहिती विचारली असता त्यांनी टाळाटाळीचे उत्तर दिले. मृत्यू झाल्याच्या चार दिवसानंतर मृतदेह पाठविण्यात आले तेव्हा मृतदेहाला दुर्गंधी सुटली होती. (शहर प्रतिनिधी)