‘युनिव्हर्सल’साठी मंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:00 AM2019-11-22T06:00:00+5:302019-11-22T06:00:52+5:30
तुमसर तालुक्यातील माडगी युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो माँग्निज शुद्धिकरण करणारा कारखाना बंद असल्याने १३०० कामगार बेरोजगार झाले आहेत. या कारखान्यासाठी माडगी शिवारातील शेतकऱ्यांनी आपल्या सुपिक जमीनी दिल्या होत्या. ३०० एकरात हा कारखाना उभारला गेला. अभय योजनेंतर्गत कारखान्याला सवलती देण्यात आल्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील माडगी येथील युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो माँग्निज शुद्धिकरण करणारा कारखाना गत १२ वर्षापासून बंद आहे. सदर कारखाना त्वरीत सुरू करण्यात यावा किंवा कारखान्यासाठी संपादित शेतकऱ्यांची ३०० एकर सुपिक जमीन त्यांना परत करण्यात यावी, अशी मागणी चेतना बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनातून केली आले.
तुमसर तालुक्यातील माडगी युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो माँग्निज शुद्धिकरण करणारा कारखाना बंद असल्याने १३०० कामगार बेरोजगार झाले आहेत. या कारखान्यासाठी माडगी शिवारातील शेतकऱ्यांनी आपल्या सुपिक जमीनी दिल्या होत्या. ३०० एकरात हा कारखाना उभारला गेला. अभय योजनेंतर्गत कारखान्याला सवलती देण्यात आल्या आहे. परंतु त्यानंतरही हा कारखाना सुरु झाला नाही. ३५ वर्ष हा कारखाना सुरु होता. १८ ऑगस्ट २००६ पासून कारखाना कायमचा बंद आहे. या कारखान्यावर सुमारे २०० कोटींचे वीज बिल थकित होते.
यापूर्वी एनटीपीसी येथे सवलतीच्या दरात कारखान्याला वीज पुरवठा करीत होती. सवलतीच्या दरात वीज पुरवठा बंद केल्याने गुंता वाढला होता. वीज वितरण कंपनीने सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यास नकार दिला होता. कारखान्याकडे सुरुवातीला ५० कोटी रुपये थकीत होते. पुढे ती रक्कम वाढून २०० कोटी रुपयांपर्यंत गेली होती. दरम्यान कारखानदाराने १८ आगस्ट २००६ मध्ये क्लोजर करण्याचा निर्णय घेतला. २७८ कामगारांना क्लोजरची माहिती दिली.
कारखाना सुरु राहावा यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षाच्यावतीने प्रयत्न करण्यात आले. परंतु त्यात यश आले नाही. मात्र प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडली होती. राज्य शासनाने आजारी कारखान्यासाठी अभय योजना सुरु केली. त्यानुसार युनिव्हर्सल (खंबाटा) फेरोने २०१४ मध्ये अभय योजनेत समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कारखान्यावरील वीज बिल आर्धे माफ करण्यात आले. कारखानदाराने २०० कोटींपैकी ४८ कोटी रुपयांचे देयक भरले. केवळ कारखाना सुरु करण्याच्या अटीवर अभय योजनेचा लाभ मिळेल, असा करारनामा करण्यात आला होता. कारखाना सुरु करण्यासाठी तीन वर्षाची मुदत देण्यात आली होती. २०१७ मध्ये तीन वर्षे लोटले तरीसुध्दा कारखानदाराने कारखाना सुरु केला नाही. कारखानदाराने कराराचा भंग केला आहे. कारखान्याकडे ३०० एकर सुपिक जमीन पडून आहे. कारखानदाराने कारखाना सुरु करावे, अन्यथा स्थानिक शेतकऱ्यांचे त्या जमीनी परत कराव्यात.
दोन वर्षापुर्वी शिवसेनेच्यावतीने युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो माँग्निज शुद्धिकरण कारखाना सुरु करण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले. परंतु प्लांट मालकाने कारखाना सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. आता केंद्रात भाजपचे सरकार आहे. विदर्भातील जनेतेशी नाळ असलेले केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे दिल्ली दरबारी वजन आहे. त्यांनी पुढाकार घेऊन युनिव्हर्सल कारखाना सुरू करुन तालुक्यातील बेरोजगारी दूर करावी, अशा आशयाचे निवेदन चेतना बहुउद्देशीय संस्थेचे सचिव अविनाश इलमे यांनी दिल्ली येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन दिले. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर संस्था पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या हा कारखाना केव्हा सुरू होतो याकडे लक्ष लागले आहे.