‘मार्च एंडिंग’ने बळीराजा दुखावला

By Admin | Updated: March 29, 2015 01:00 IST2015-03-29T01:00:36+5:302015-03-29T01:00:36+5:30

निसर्ग कोपला तर सारं काही क्षणात मातीमोल होतं याचा प्रत्यक्ष अनुभव आज बळीराजा अनुभवत आहे.

'March Ending' hurt the victim | ‘मार्च एंडिंग’ने बळीराजा दुखावला

‘मार्च एंडिंग’ने बळीराजा दुखावला

निलागोंदी : निसर्ग कोपला तर सारं काही क्षणात मातीमोल होतं याचा प्रत्यक्ष अनुभव आज बळीराजा अनुभवत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गारपीट, वादळवारा, पाऊस व ढगाळ वातावरण यामूळे गावागावांत आजार बळावत आहेत.
वर्षभर शेतकरी काबाडकष्ट करतो. जीवाचे रान करतो. मुलांच्या शिक्षणाची तुटपुंज्या खर्चात सोय लावण्याचा नेहमी प्रयत्न करतो, परंतु त्याला त्याच्या कुटुंबीयांचे स्वप्न पूर्ण करता येत नाही
अवकाळी पावसाने शेतातील उन्हाळी धानपीक, चणा, गहू, उडीद, इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात भाजीपाला मातीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यात कुटुंबाचा उदरनिर्वाह ही मुख्य जबाबदारी पूर्ण करताना मुला-मुलींचे विवाह सोहळे पूर्ण कसे करायचे, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. यातच आर्थिक टंचाई असताना बँकाचा कर्जवसुलीचा फटका शेतकऱ्याचा जीवघेणा ठरत आहे. बँकेकडून घेतलेले कर्ज ३१ मार्चपर्यंत शून्य व्याज दराने फेडायचे कसे, असा प्रश्न त्याला पडला असताना तो जीवाचा आटापिटा करतो आहे. खासगी सावकाराकडे जाऊन सावकार नो क्रेडिट नावाखाली परत फरतो. बँकेचे आधीचेच कर्ज डोक्यावर असल्याने बळीराजा आर्थिक विंवचनेत कुचल्या जात आहे.
शेती उत्पादनावर आधारित गोडाऊनची सोय नसल्याने भाजीपाला व इतर धान्य साठवणूक करण्याची सोय नसल्याने शेतीचे वाण बेभाव विकावे लागत असल्याने शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
निवडणुकीपूर्वी विविध पक्षांचे नेते शेतकऱ्याला आश्वासनाची माळ घालतात, परंतु निवडून आल्यावर ती आपोआपच केव्हा सुकून जाते ते मात्र न उलगडणारे एक कोडेच असते.
शेतकरी या दुष्काळाच्या विळख्यातून सतत बाहेर पडण्याची स्वप्न पाहत असतो. पण त्याचेच स्वप्न केवळ हवेत विरुन जातात. धानाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्याने साठवून ठेवलेली धान्याची कोठारे तशीच पडून आहेत. यामुळे कुटुंबाची स्वप्ने तो पूर्ण करु शकत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायला आज कुणाजवळ वेळही नाही ही आजच्या शेतकऱ्याची शोकांतिका आहे. व्यापाऱ्याला धान विकल्यावरही नकदी भावाने चुकारे मिळत नसल्याने ३१ मार्चपूर्वी कर्ज भरायचे कसे हा आर्थिक संकट शेतकऱ्यावर दडपण वाढवत असून कुटुंबाची दैनावस्था होण्यास कारणीभूत ठरत आहे. बँकेचे कर्ज, सावकाराचे कर्ज, मुलामुलीचे लग्न, नातेवाईक मंडळीकडे असणारे लग्न व त्यासाठी करावयाचे खर्च, कौटुंबिक खर्च, शिक्षणाचा खर्च या सर्व खर्चाला आज शेतकरी कंटाळला असला, तरी आशेवर किती दिवस काढायचे, असा सवाल शेतकरी करीत आहे. शेतकऱ्याचा कोणी वाली आहे का? त्याने शेतकऱ्याचे अश्रू पुसून दिलासा द्यावा, अशी मागणी या परिसरातील शेतकरी बंधंूनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: 'March Ending' hurt the victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.