गरिबांना घरासाठी जागा उपलब्ध करून देणार
By Admin | Updated: May 19, 2016 00:25 IST2016-05-19T00:25:26+5:302016-05-19T00:25:26+5:30
जिल्ह्यातील ज्या गरीब कुटुंबाजवळ घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही, अशा सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करावे,...

गरिबांना घरासाठी जागा उपलब्ध करून देणार
नाना पटोले यांचे प्रतिपादन : जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीचा निर्णय
भंडारा : जिल्ह्यातील ज्या गरीब कुटुंबाजवळ घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही, अशा सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करावे, पंडित दीनदयाल उपाध्याय घरकूल योजनेमधून या सर्वांना जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.
जिल्हा परिषद सभागृहामध्ये झालेल्या या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आमदार चरण वाघमारे, राजेश काशिवार, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, उपवनसंरक्षक एन.आर. प्रवीण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एक परिवार आहे असे समजून चांगले काम करावे, लोकांच्या फायद्याचा विचार करून नवीन संकल्पना राबवाव्यात, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी यावेळी केले. या बैठकीत तुमसर तालुक्यातील साखळी गावातील ३५ आदिवासींना इंदिरा आवास योजनेमध्ये १९८४ साली घरे बांधून दिले होते त्यातील काही लाभार्थ्यांची जागा ही खासगी व्यक्तीची असल्याचे निदर्शनास आले. सध्या ३५ पैकी चार लाभार्थ्यांना पुन्हा घरकुल योजनेंतर्गत घर मंजूर झालेले आहेत. त्या लाभार्थींच्या घराचे बांधकाम थांबविण्यात आल् याचा प्रश्न कलाम शेख यांनी उपस्थित केला. याबाबत जिल्हाधिकारी यांनी सदर खासगी जागा मालकाला संबंधित जागेचा मोबदला देवून जमीन संपादित करण्यात येईल. त्याबरोबर घरकुलाचे बांधकाम पुन्हा सुरु करण्यासंबंधात सदर व्यक्तीशी चर्चा करावी, असे निर्देश उपविभागीय अधिकारी तुमसर यांना दिले. २०१४-१५ मध्ये सानगडी आणि महालगाव येथील मनरेगाचे काम करणाऱ्या २४५ मजुरांना मजुरी मिळाली नसल्याचा मुद्दा आमदार वाघमारे यांनी उपस्थित केला. सदर प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी मनरेगा आयुक्तांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल. जर त्यांच्या अधिकारात हा विषय बसत नसल्यास शासनस्तरावरून मंजुरी घेण्यात येईल असे सांगितले. त्याचबरोबर मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती दिली. टेमनी गावातील मजुरांची मजुरी तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. रमाई, शबरी, इंदिरा आवास अशा सर्व योजनेत घर बांधलेल्या लाभार्थ्यांना शौचालय बांधण्याची रक्कम यावर्षी देण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. वैनगंगा नदीचे पाणी दूषित झाल्याचा अहवाल निरीकडून प्राप्त झाला आहे. यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण वाढले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. यासाठी नाग नदीवर राबविण्यात येणारा प्रकल्प डिसेंबर २०१७ मध्ये पूर्ण होणार आहे. (नगर प्रतिनिधी)