‘त्या’ प्रवाशांचे नशीब बलवत्तर ठरले
By Admin | Updated: June 23, 2015 01:12 IST2015-06-23T01:12:49+5:302015-06-23T01:12:49+5:30
रस्त्यावरील बकऱ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

‘त्या’ प्रवाशांचे नशीब बलवत्तर ठरले
भिलेवाडाजवळील घटना : बसची विद्युत खांबाला धडक, बकऱ्या आल्या आडव्या
भंडारा : रस्त्यावरील बकऱ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यात अनियंत्रित बस रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबाला धडकली. बसमध्ये प्रवास करणाऱ्या ४५ प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. त्यांचे नशिब बलवत्तर असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची घटना आज दुपारी १ वाजताच्या दरम्यान भिलेवाडा जवळ घडली.
नागपूर आगाराची एनआर २ एमएच १२ इ एफ ६७१० या क्रमांकाची बस गोंदिया येथून नागपूरकडे निघाली होती. या बसवर चालक म्हणून चंद्रकुमार ओमकार तर वाहक म्हणून पी. के. अहिरकर हे कर्तव्यावर होते. गोंदिया येथून नागपूरला निघालेल्या या बसमध्ये ४५ प्रवाशी प्रवास करीत होते. रात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना काही प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान भिलेवाडा गावाजवळील एक गुराखी बकऱ्यांचा कळप घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून जात होता. भरधाव बसखाली बकऱ्या येऊन चिरडू नये म्हणून चालकाने बसचे करकचून ब्रेक लावले. रस्त्यावरील पावसाच्या पाण्यामुळे बस अनियंत्रीत झाल्याने रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबावर बस आदळली.
विद्युत प्रवाह सुरु असताना हा अपघात झाल्याने प्रवाशांनी एकच किंचाळी फोडली. मात्र त्यांचे नशिब बलवत्तर असल्याने विद्युत तारा तुटून बसवर कोसळल्या नाही. जर, असा प्रकार घडला असता तर बसमधील ४५ प्रवाशांसह चालक, वाहकांवरही दुर्देवी प्रसंग ओढावला असता. या अपघातातून सुखरुप बचावल्यानंतर अनेक प्रवाशांच्या तोंडून आपोआपच देव तारी त्याला कोण मारी हा प्रत्यय आल्याचा अनुभव व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी)