‘स्वच्छ भारत’ला खो
By Admin | Updated: July 13, 2015 00:51 IST2015-07-13T00:51:59+5:302015-07-13T00:51:59+5:30
उघड्यावर होत असलेल्या शौचामुळे अनेक आजार जडत असल्याचे पुढे आल्याने गावागावात स्वच्छ भारत अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘स्वच्छ भारत’ला खो
गाव सीमेवरील दुर्गंधी कायम : शासनाच्या योजना ठरताहेत कुचकामी
तुमसर : उघड्यावर होत असलेल्या शौचामुळे अनेक आजार जडत असल्याचे पुढे आल्याने गावागावात स्वच्छ भारत अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात शासकीय अनुदानावर शौचालय बांधण्याची योजना अंमलात आली. अनेकांनी योजनेचा लाभ घेत शौचालय बांधले, मात्र त्याचा वापर होत नसल्याचे गावाच्या शीवेवर जाताच दिसून येते. कोट्यवधी रुपये खर्च झाले तरी गाव येताच येणारी दुर्गंधी कायमच असल्याचे दिसते.
यावर प्रतिबंध लावण्याकरिता उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. याकरिता पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर गुड मॉर्निंग पथक निर्माण करण्यात आले. या पथकांतर्गत कोणतीही कारवाई होत नसल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. शासनाची ही योजना राबविण्यात कर्मचारीही नाखूष असल्याने ती यशस्वी होत असल्याने ती यशस्वी होत नसल्याचे दिसून आले आहे.
उघड्यावर शौच करणाऱ्यावर कारवाई करण्याकरिता विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. ग्रामपंचायत अधिनियम १९८५ च्या कलम ४९ अंतर्गत ग्रामपंचायतचे कार्य चालविण्यासाठी विविध ग्राम विकास समितीचे गठन करण्यात आले आहे. यात गावातील गणमान्य व्यक्तींचा समावेश असेल. समितीच्या सदस्यांना शौचालय उपयोगाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायत व पंचायत समितीस्तरावर गुड मॉर्निंग पथकच्यावतीने गस्त घालण्याचे आदेशात म्हटले आहे.
ग्रामीण क्षेत्रातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोनचा उपयोग करीत आहेत. स्वच्छ भारत मिशनच्यावतीने वॉटसअॅपसारखे अँप तयार करुन स्वच्छतेसंबंधी माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. घाण पसरविणाऱ्यांवर काय कारवाई केली जाऊ शकते. याची माहिती तांत्रिक माध्यमाने देण्यात येणार आहे. त्याची सुरुवात अद्यापही झालेली नाही.
या निर्णयावर कारवाई सुरु झाली त्यावर अंमलबजावणीची शंकाच आहे. ग्रामीण भागात शासनाच्या योजना कुचकामी ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)