लोहारा, जांब परिसरातील शेतकऱ्यांच्या पावसाकडे नजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:57+5:302021-07-21T04:23:57+5:30
रमेश लेदे जांब /लोहारा : मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दिवसा कडाक्याचे ऊन पडत असल्याने धानाचे पहे ...

लोहारा, जांब परिसरातील शेतकऱ्यांच्या पावसाकडे नजरा
रमेश लेदे
जांब /लोहारा : मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दिवसा कडाक्याचे ऊन पडत असल्याने धानाचे पहे करपण्यास सुरुवात झाली आहे. तसेच पाऊस झाला नसल्याने बियाणे पूर्णपणे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार धानाचे पहे टाकण्याची पाळी आली आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाली असली तरी अद्यापही दमदार पावसाअभावी अनेक ठिकाणी रोवणी झालेली दिसून येत नाही.
पावसाने उघडीप दिल्याने बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरवर्षी शेतकरी खरीप हंगामात नव्या जोमाने तयारीला लागतो. तसाच या वर्षीही बळीराजाने बँकेचे कर्ज तसेच उसनवार करून खरीप हंगामाची जुळवाजुळव केली. मात्र मागील पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजाला पाणी विकत घेऊन तर काही ठिकाणी इंजीन व मोटारपंपाच्या साहाय्याने पहे जगविण्याची वेळ आली. परंतु पुन्हा पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या मार्गावर असून, येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. गत वर्षाचा तोटा भरून निघेल या आशेने अनेकांनी मिळेल तिथून कर्ज घेतले. मात्र ऐन खरीप हंगामातच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे. काही ठिकाणी पाणी आहे, पण वीज नाही.
गत आठवड्याभरापासून पावसाने दडी मारल्याने पहे करपण्याच्या मार्गावर आहे. बळीराजाने केलेला खर्च निघेल की नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. कर्जमुक्त होण्याचे स्वप्न बळीराजाच्या नशिबीच नाही काय? असे चित्र दिसत आहे. लोहारा, जांब, धोप, पिटेसुर, रोंघा, लेंडेझरी, लंजेरा, देऊळगाव, ताळगाव, सकरला, आंबागड, रामपूर आदी परिसरातील शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त झाले आहेत. परिवाराच्या पालनपोषणासाठी अनेकांना रोजगाराची चिंता सतावू लागली आहे.