शहरवासीयांना पिवळसर पाणी पुरवठा
By Admin | Updated: April 27, 2015 00:11 IST2015-04-27T00:11:22+5:302015-04-27T00:11:22+5:30
मागील १५ दिवसांपासून नळांद्वारे पिवळसर पाणी येत असताना नगरपालिका चुप्पी साधून आहे. ..

शहरवासीयांना पिवळसर पाणी पुरवठा
भंडारा : मागील १५ दिवसांपासून नळांद्वारे पिवळसर पाणी येत असताना नगरपालिका चुप्पी साधून आहे. नगरपालिकेच्या या दुर्लक्षित धोरणामुळे शहरातील जवळपास सव्वा ते दीड लाख लोकांना जलजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता आहे.
या शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासह मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेली जिल्हा परिषदेची भव्य इमारत, शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालये आहेत. जिल्ह्याचा कारभार याच ठिकाणाहून हाकला जातो. शैक्षणिक संस्था असल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर, जिल्हाबाहेरील विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येतात. परंतु, कोणत्याही कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना ठेपाळलेल्या कारभाराचा प्रत्यय येतोच. पंधरा दिवसांपासून नळांना पिवळसर पाणी येत आहे. या पाण्याचा थर अर्ध्या तासाने गुंडात किंवा बादलीच्या खाली साचतो. शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन जागोजागी फुटल्याने तर काही पाईपलाईन जीर्ण झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे बोलले जाते. हा प्रकार नगरपालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना माहित असतानादेखील ते याकडे का दुर्लक्ष करतात. हे न समजण्यापलिकडे आहे. या अशुद्ध पाण्यामुळे शहरातील लोकांना जलजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन ताबडतोब उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)
वैनगंगा दूषित
वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात असल्याने दुर्गधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे़ शासन स्तरावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी ताालुक्यात गोसीखुर्द येथे वैनगंगा नदीवर मोठे धरण बांधले आहे़ त्यामध्ये पाणी अडविण्यात आले आहे. नागपुरातून वाहत येणाऱ्या नाग व कन्हान नदीचे घाण पाणी वैनगंगा नदीत मिसळते़ गोसे धरणातील जलसाठा दूषित झाला आहे. धरणात पाणी अडविल्यामुळे वैनगंगा नदी दुथडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर झाला आहे. एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. कोणत्याही प्रकारचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदी काठावरील गावाचे गुरेढोरे नदीतीलच पाणी पितात. दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचे जनावरांना रोगराई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रदूषणाची समस्या कायमस्वरुपी सुटावी
पवनी : नागनदीच्या प्रदूषणामुळे महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. पवनी तालुक्यातील २५ गावातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने या प्रदूषणाच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
धरणातील दूषित पाण्याचा पुरवठा पवनी शहराला होत आहे. नागपूर शहरातून वाहणाऱ्या नागनदीत शहरातील ३४५ पैकी २६५ एमएलडी सांडपाणी दररोज सोडले जात आहे. ही नागनदी अन्य चार नद्यांसोबत आंभोराजवळ वैनगंगा नदीला येवून मिळते. ते वैनगंगा नदीचे पाणी गोसीखुर्द धरणात येवून जमा होते.
नागनदीच्या प्रदूषित पाण्यामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. पवनी तालुक्यातील वैनगंगा नदी काठावर २५ गावे व पवनी शहरासह अनेक गावातील पाणी प्रदूषित झाले आहे. याचे प्रमाण मिळाले आहेत. नदीकाठावर अनेक गावात मोठ्या प्रमाणात डासांची व जीवजंतूची निर्मिती झाली आहे. त्यामुळे मलेरिया, डेंगू आदी आजारांच्या प्रादूर्भावाने जनता त्रस्त झाली आहे.
या प्रदूषणावर केंद्र व राज्य सरकारने कायमस्वरुपी तोडगा काढण्याची आज गरज निर्माण झाली आहे. नागनदीचे प्रदूषण थांबविण्याकरिता नागपूर महानगर पालिकेने मागील वर्षी १,३२८ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला होता. तो मंजूरही झाला. पण अजूनपर्यंत याची अंमलबजावणी न झाल्यामुळे हे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीच्या पात्रातील सोडले जाणारे पाणी प्रदूषित, दुर्गंधीयुक्त, काळ्या - पिवळ्या व हिरव्या रंगाचे आहे. धरणाजवळ थांबल्यास या सोडल्या जाणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येते. या प्रदूषित पाण्याचा सर्वाधिक फटका पवनी शहराला बसत आहे. या प्रदूषित पाण्यामुळे यावर्षी विषमज्वर, काविळचे मोठ्या संख्येत रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी अनेकांचा मृत्यू झाला आहे. शहरातील प्रदूषित पाण्याची समस्या तातडीने सुटण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)