बहीण-भावाच्या प्रेमाचा ‘दुवा’ टपाल विभाग
By Admin | Updated: August 26, 2015 00:27 IST2015-08-26T00:27:14+5:302015-08-26T00:27:14+5:30
भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो.

बहीण-भावाच्या प्रेमाचा ‘दुवा’ टपाल विभाग
\विश्वासार्ह जोपासले : भारतीय पोस्टाची अविरत सेवा, स्मार्टफोन सेवेतही आर्थिक उलाढाल
प्रशांत देसाई भंडारा
भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो. अनादि काळापासून सुरू असलेल्या भाऊ-बहिणीच्या या प्रेमाचा खऱ्या अर्थाने ‘दुवा' ठरला आहे, तो भारतीय टपाल विभाग.
आधुनिक यांत्रिक युगात स्मार्टफोन, व्हॉट्स अप, फेसबुकला फार मोठे महत्त्व आले आहे. यामुळे आदानप्रदान मोबाईलमधूनच चुटकीसरशी होत आहे. तीन दिवसावर आलेल्या रक्षाबंधनामुळे पोस्टाची आर्थिक आवक वाढली आहे. इंटरनेटच्या आधुनिक युगातही परंपरागत भारतीय पोस्ट खात्याने नागरिकांच्या मनात आपली प्रतीमा जोपासली आहे. पुढील पंधरा दिवस पोस्टातून भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या विविधांगी राखींचा प्रवास होणार आहे. ऐरव्ही, आर्थिक उलाढाल मंदावली असे चित्र असलेल्या टपाल कार्यालयातून राखींच्या प्रवासामुळे मोठे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.
भंंडारा मुख्य डाकघरांतर्गत १९ उपडाक कार्यालय तथा १२० शाखा कार्यालय (ग्रामीण टपाल सेवा) आहेत. ग्रामीण विभागात २५५ तर विभागाीय कार्यायलात १०४ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील ४० कर्मचारी हे भंडारा मुख्य डाकघर येथे कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी बहिण-भावाच्या प्रेमाचा 'दवा' ठरले आहेत. दुरवर राहणारी बहिण आपल्या लाडक्या भावाला प्रेमाने राखी पाठविते. ती वेळेत तिच्या भावाला मिळावी यासाठी हे कर्मचारी कार्यरत आहेत. इंटरनेटचे युग असल्याने अनेकजण आता स्मार्टफोनच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देतात. त्यामुळे पूर्वी दिवाळी, दसरा किंवा पारंपारिक सणांना पाठविण्यात येणारे शुभेच्छा कार्डला आता फाटा बसला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून पोस्ट कार्यालयाला याचा आर्थिक फटका बसला आहे. असे असले तरी, रक्षाबंधन या सणाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने बहिण आपल्या भावाला पोस्टातून राखी पाठवित असल्याने पोस्टावरील नागरिकांचा विश्वास आजही अबाधित आहे, हे लक्षात येते.ऐरव्ही, डाक विभागातून विविध विभागांचे व आध्यात्मिकतेचे मासीक, बँक, आरटीओ, एलआयसी यांच्यासह शासकीय कार्यालयांचा पत्रव्यवहार होतो. मात्र, रक्षाबंधन असा एकमात्र सण आहे, बहिण भावाला राखी पोस्टाने किंवा कुरिअरने पाठविते. भारतीय पोस्ट विभागाने विश्वासर्हता जोपासली असल्याचे हे ध्योतक आहे. भंडारा मुख्य डाकघर येथून सध्या दररोज सुमारे २५० राखी स्पीड पोस्टने व ५०० राखी साधारण डाकने पाठविण्यात येत आहे. तर बाहेरून किमान ९०० राखीचे लिफापे येत आहेत. येत्या पंधरा दिवसात भंडारा मुख्य डाकघर येथून राखीचे किमान ५ हजार स्पीड पोस्ट तर साधारण ३ हजार डाक जाण्याची शक्यता आहे. तर जिल्हाभरातील डाक कार्यालयाचा विचार केल्यास सुमारे १५ हजार राखींचे लिफापे स्पीड पोस्टने तर तेवढीच लिफापे साधारण डाकने पाठविण्यात येण्याची शक्यता आहे. या व्यवहारातून केवळ पंधरा दिवसात डाक विभागाचे किमान चार लाखांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.
पौराणिक कथा व इतिहात चाळता रक्षाबंधन या सणात काळानुरूप बदल झालेला आढळतो. आता तर हे पर्व भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे व बंधनाचे पर्व म्हणून देशात साजरे होताना दिसते. त्यात बहिण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधत असते व भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्विकारत असतो. काळ बदलला असला तरी आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भाऊ- बहीनींच्या स्नेहाचा 'रक्षाबंधण' या सणाचे महत्त्व कायम आहे.