विवाह समारंभांनाही कर्जाचा विळखा

By Admin | Updated: April 1, 2015 00:37 IST2015-04-01T00:37:20+5:302015-04-01T00:37:20+5:30

यंदाचा लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून दुष्काळातही ग्रामीण भागात खर्चीक सोहळ्यांना ऊत आल्याचे चित्र आहे.

Lending to marriage ceremonies | विवाह समारंभांनाही कर्जाचा विळखा

विवाह समारंभांनाही कर्जाचा विळखा

भंडारा : यंदाचा लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून दुष्काळातही ग्रामीण भागात खर्चीक सोहळ्यांना ऊत आल्याचे चित्र आहे. काही प्रमाणात खर्चीक विवाहाला फाटा देऊन कुंकवातच लग्न उरकवण्याचीही अनेक उदाहरणे ग्रामीण भागात आहेत; पण याचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसते. यामुळे अनेक जण कर्जबाजारी होऊन वा उसनवारी, उधारी घेऊन खर्चीक लग्न करीत असल्याचे दिसते. याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
कुंकवाच्या लग्नात अनावश्यक खर्चाला फाटा दिला जातो; पण संसारोपयोगी साहित्य व इतर खर्चासाठी वधु पित्याला कर्ज काढावे लागते; किमान हा खर्च उपयोगी पडतो. लग्नांमध्ये बॅन्डबाजा, डीजे, मंडप, कपडे खरेदी, जेवणावळ यावर सर्वाधिक खर्च होतो. वास्तविक या खर्चाचा भावी वर-वधूंना कोणताही उपयोग होत नाही. सध्या ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण वाढले असल्याने दोन्हीकडील मंडळी एकमेकांच्या विचाराने कुंकवात लग्न उरकवण्यावर भर देत आहेत. ही उदाहरणे ताजी असताना दुष्काळातही कर्जबाजारी होऊन धडाक्यात लग्न उरकण्याचे प्रमाणही कमी झाले नाही. गत तीन वर्षांपासून दुष्काळाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. कधी अपुरा पाऊस तर कधी अतीवृष्टी. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती मोठ्या प्रमाणात उत्पादन आले नाही. केलेला खर्च निघत नसल्याने अनेकांनी शेतीला जोडव्यवसाय सुरू केला. काही भागात प्रतिष्ठा राखण्यासाठी लग्नसराईत कर्ज काढून खर्च करायचा व शेतीचे उत्पन्न हाती न आल्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून नैराश्यातून आत्महत्येचे प्रमाणही वाढत आहे. पिकांच्या भरवशावर कर्ज घ्यायचे. निसर्गाच्या प्रकोपाने हाती काही न लागल्यास कर्ज फेडायचे कोठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. यातूनच आत्महत्येचे प्रमाण वाढत असून याला आळा घालणेही अगत्याचे झाले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Lending to marriage ceremonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.