मुंबई-हावडा रेल्वेमार्गाला भूस्खलनाचा धोका
By Admin | Updated: May 19, 2014 23:15 IST2014-05-19T23:15:43+5:302014-05-19T23:15:43+5:30
बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाच्या रोहा-मांढळ दे. वितरीकेला भगदाड पडल्याने मांढळ गावाजवळील मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गाला भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे

मुंबई-हावडा रेल्वेमार्गाला भूस्खलनाचा धोका
मोहन भोयर - तुमसर बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाच्या रोहा-मांढळ दे. वितरीकेला भगदाड पडल्याने मांढळ गावाजवळील मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गाला भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून या रेल्वे मार्गाजवळ दीड ते दोन फुट पाणी साचले होते. या गंभीर तथा महत्वपूर्ण समस्येकडे बावनथडी प्रकल्प व रेल्वे अधिकार्यांचे मात्र दुर्लक्ष दिसत आहे. बावनथडी राजीवसागर धरणातून धान पिकाकरिता मागील एक ते दीड महिन्यापासून पाणी सोडण्यात येत होते. मांढळ ते गावाजवळ रोहा-मांढळ प्रमुख वितरीकेला भगदाड पडले आहे. या भगदाडातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचे लोट वाहत होते. मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गाच्या बाजूने हे पाणी सखल भागाकडे मांढळ गावाच्या दिशेने वाहत एका लहान रेल्वे पुलाखाली येवून तलावाचे रूप धारण करत आहे. पुढे या पाण्याला जाण्यास मार्गच नाही. पुलाखालून शेतकर्यांना जाण्यास रस्ता आहे. पुढे शेत आहे. रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी तुडूंब भरले होते. या पाण्यातूनच शेतकर्यांना मार्गक्रमण करावे लागत होते. मागील दीड दोन महिन्यापासून पाणी येथे साचले राहिल्याने रेल्वे मार्गाला धोका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतापासून रेल्वे ट्रॅक ऊंच असून मातीच्या ढीगार्यावरच तो वर्षानुवर्षे आहे. रेल्वे ट्रॅकजवळ सतत पाणी मुरल्याने माती निश्चितच पोकळ होण्याची भीती आहे. मागील हिवाळ्यात व सध्या उन्हाळ्यात बावनथडी प्रकल्पातून सातत्याने पाणी सोडल्या जाते. त्यामुळे येथे भूस्खलनाचा धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमसर रोड रेल्वे स्थानकापासून हे स्थळ केवळ दोन ते अडीच कि.मी. अंतरावर आहे. रेल्वे ट्रॅकचे निरीक्षण करणारे मुख्य कार्यालय, उपविभागीय अभियंता, स्थापत्य अभियंते येथे कार्यरत आहेत. परंतु या गंभीर बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. २४ तासात या प्रमुख रेल्वे मार्गावरून १८0 ते १८५ प्रवाशी व मानलवाहतूक गाड्या दररोज धावतात भूस्खलानाच्या अनेक अपघात रेल्वे मार्गावर यापूर्वी देशात घडले आहेत. त्यापासून येथे धडा घेतल्याचे येथे दिसून येत नाही. या संदर्भात रेल्वे प्रशानाने बावनथडी प्रकल्प अधिकार्यांशी संपर्क केल्याची माहिती नाही. प्रकल्प अधिकारी यासंदर्भात अनभिज्ञ दिसत आहेत. मांढळ दे. येथील शेतकर्यांशी संवाद साधल्यावर इकडे प्रकल्पाचे अधिकारी भटकतांनी दिसले नाहीत, असे सांगितले. सध्या बावनथडी प्रकल्प कार्यालयाची कामे रामभरोसेच दिसून येत आहे. गोंदिया, तुमसर बघेडा येथे कार्यालय आहे, परंतु एकही अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. नागपूर वरूनच ये-जा करणे सुरू आहे.