लाखांदूर तालुक्यात हागणदारीमुक्ती कागदावरच

By Admin | Updated: May 5, 2017 00:40 IST2017-05-05T00:40:22+5:302017-05-05T00:40:22+5:30

शासनाने लाखांदूर पंचायत समिती हागणदारीमुक्त घोषित करून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी हारतुरे स्वीकारले.

In Lakhandur taluka, on the Deletion Removal Paper | लाखांदूर तालुक्यात हागणदारीमुक्ती कागदावरच

लाखांदूर तालुक्यात हागणदारीमुक्ती कागदावरच

स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा : गावागावात आजही उघड्यावरच शौचविधी
हरिश्चंद्र कोरे विरली (बु.)
शासनाने लाखांदूर पंचायत समिती हागणदारीमुक्त घोषित करून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी हारतुरे स्वीकारले. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून पाठ भोपटून शाबासकी मिळविली. मात्र प्रत्यक्षात लाखांदूर पंचायत समितीतील अनेक गावातील नागरिक अद्यापही उघड्यावरच शौचासाठी जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे लाखांदूर पंचायत समितीची हागणदारीमुक्त अभियान केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
आपला गाव व परिसर स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानांतर्गत वैयक्तीक शौचालयाच्या बांधकामासाठी १२ हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.
भंडारा जिल्ह्यात या अभियानाची युद्धस्तरावर अंमलबजावणी करण्यात आली. प्रत्येक पंचायत समितीला वैयक्तीक शौचालय बांधकामाचे ठराविक उद्दीष्ट देऊन मार्च २०१७ पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले. मात्र प्रशासकीय यंत्रणेकडून हे उद्दिष्ट निश्चित करताना प्रत्येक गावातील शौचालयांची सद्यस्थिती विचारात घेण्यात आलेली नाही.
चार-पाच वर्षांपूर्वी निर्मलग्राम घोषित झालेल्या गावांना या अभियानातून वगळण्यात आले. आणि येथेच स्वच्छ भारत अभियानाला सुरूंग लागला आहे.
लाखांदूर पंचायत समितीमध्ये ६२ ग्रामपंचायती येतात. यापैकी ९ ग्रामपंचायत सन २०१५-१६ मध्ये हागणदारीमुक्त झाल्या होत्या. ११ ग्रामपंचायत निर्मलग्राम म्हणून घोषित झाल्या होत्या. स्वच्छ भारत अभियान २०१७ साठी पंचायत समितीला ४२ ग्रामपंचायतीमध्ये १० हजार ४४८ वैयक्तीक शौचालयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. हे उद्दिष्ट गाठून पंचायत समितीने हागणदारीमुक्त होण्याचा मान पटकावला. मात्र प्रत्यक्षात चार-पाच वर्षांपूर्वी निर्मलग्राम घोषित झालेल्या गावांचे निर्माल्य केव्हाचेच लोप पावले आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष झाल्यामुळे या गावांच्या सद्यस्थितीचा फेरआढावा घेण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही.

गरज आठ कोटीची मदत ५० लाखाची
मोहाडी तालुक्यात सन २०१५-१६ या वर्षात ७७ ग्रामपंचायतींना १०,६८४ शौचालयांचे उद्दिष्ठ देण्यात आले. वर्षभरात १०,६५० शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. उद्दिष्ठापैकी ३,५०० लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप झाले असून ७,१८४ लाभार्थी प्रतिक्षेत आहेत. यासाठी ८ कोटी ६२ लाख रूपयांच्या अनुदानाची गरज असताना एप्रिल महिन्यात मोहाडी पंचायत समितीला केवळ ४२० शौचालयांचे ५० लाख ४० हजाराचे अनुदान प्राप्त झाल्याने लाभार्थ्यांत असंतोष पसरला आहे. त्यामुळे प्रती गाव १० टक्के याप्रमाणे अनुदान वाटप करण्याचे निर्देश खंड विकास अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिले आहे. लाखांदूर तालुका हागणदारीमुक्त झाल्याचे सांगून प्रशासनाने गाजावाजा करीत कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमात लोकप्रतिनिधीसह तत्कालीन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे स्वच्छता पाणी मिशनचे अधिकारी सहभागी झाले होते.
 

Web Title: In Lakhandur taluka, on the Deletion Removal Paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.