सौंदड पुनर्वसन गावठाणात नागरी सुविधांचा अभाव
By Admin | Updated: May 18, 2015 00:29 IST2015-05-18T00:29:02+5:302015-05-18T00:29:02+5:30
विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरण पूर्णत्वाच्या मार्गावर असताना शासनाने धरणाचे पाणी २४२ मीटरपर्यंत अडविण्याची ..

सौंदड पुनर्वसन गावठाणात नागरी सुविधांचा अभाव
व्यथा प्रकल्पग्रस्ताची : पुनर्वसनकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
प्रकाश हातेल चिचाळ
विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरण पूर्णत्वाच्या मार्गावर असताना शासनाने धरणाचे पाणी २४२ मीटरपर्यंत अडविण्याची भूमिका घेतल्याने धरणाच्या बुडीत क्षेत्रातील सौंदळ गावाला पाण्याने वेढले असून काहीचे घरात पाणी शिरले आहे. मात्र पुनर्वसन गावठाणात अद्यापही १८ नागरी सुविधा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थामध्ये रोष असून आधी पुनर्वसननंतरच स्थलांतरण करण्याचा पवित्रा सरपंच राजहंस भुते व ग्रामस्थांनी घेतला आहे.
इंदिरा सागर गोसीखुर्द प्रकल्पाच्या पुनर्वसनात सौंदळ हे गाव प्रकल्पाच्या पोटात असून नदी शेजारी वसले आहे. गावात ३३८ कुटुंब व ७९२ लोकसंख्या आहे. प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून शासनाने पाणी अडविण्याची भूमिका घेतल्याने १३४ कुटुंबाचे गावठाण चकारा येथे स्थलांतरण झाले तर ज्यांना भुखंड मिळाले नाही त्यांचे घराचे चारही भोवती पाण्याने वेढले आहे. पाण्याशेजारील कुटुंब साप, विंचू आदी जलचर पाण्यापासून भीत भीत दिवस काठीत आहेत.
पुनर्वसन गावठान चकारा येथे १३४ कुटुंबाचे स्थलांतरण झाले आहे. बाकी २०४ कुटुंब, शाळा, ग्रामपंचायत नवीन गावठाणात स्थलांतरण झाले नाही. त्यामुळे स्थलांतरित कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
शासनाने ज्यांना भूखंड दिले नाही त्यांना तत्काळ भूखंड द्यावे त्यामुळे ते जुने गावठाण सोडतील, जुने विद्युत मीटर नवीन पुनर्वसनातील घरी ट्रान्सफर करून द्यावे, पाण्याखाली आलेल्या सुरबोडी येथील शेतीचे अनुदान देण्यात यावे, नवीन गावठाणात मकान बांधकामासाठी पाण्याची व्यवस्था करावी व उघड्या विहिरीचे तोंडीचे बांधकाम करण्यात यावे, बंद हॅन्डपंप, विद्युत पथदिवे सुरू करावे.
पाणी वाहून नेणारी नाही. जमीनदोस्त झाल्याने नालीचे बांधकाम नव्याने करण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांना पेन्शन योजना व बीपीएलचा लाभ देण्यात यावा, कुटुंबाची संख्या पाहुण प्रकल्पग्रस्तांना शेती खरेदी करून द्यावी, जुन्या गावठाणातील वाढीव बांधकामाचा मोबदला देण्यात यावा, कलम ४ नंतर बांधकाम केलेल्या घराचा मूल्यांकन करून मोबदला देण्यात यावा, ढिवर समाज बांधवांना प्रकल्पात मच्छिमार करण्याचा अधिकार देण्यात यावा, ज्यांना नवीन गावठाणात भूखंड मिळाले, परंतु त्यांना पॅकेजचा लाभ मिळाला नाही, त्या कुटुंबांना लाभ देण्यात यावा, सौंदळ, खापरी येथील काही घर टॅक्सधारकांना भूखंड व पॅकेजचा लाभ मिळाला नाही त्यांना लाभ देण्यात यावा. सौंदळ, खापरी येथील हनुमान मंदिर व बौद्ध विहाराला भूखंड देण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांना नोकरीऐवजी १५ लाख रूपये देण्यात यावे, सौंदळ गटग्रामपंचायतमधील सुरबोडी या गावाची शहानिशा करून त्याचे पुनर्वसन करण्यात यावे. नवीन गावठाणात १८ नागरी पूर्ण झाल्या नाहीत. त्या पूर्ण करून द्याव्या, प्रकल्पबाधित गावठाणातील व पुनर्वसन गावठाणातील संपूर्ण समस्या सोडविल्याशिवाय गाव सोडणार नाही, असे वरिष्ठांना निवेदन देवून सरपंच राजहंस भुते, उपसरपंच विजय निंबार्ते व प्रकल्पग्रस्तांनी मागणी केली आहे.
शासन नवीन गावठाणात १८ नागरी सुविधांची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत शाळा, ग्रामपंचायत व गावठाणातील प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतरण होणार नाही. न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल तरी ग्रामपंचायत मागे येणार नाही.
- राजहंस भुते,
सरपंच ग्रामपंचायत सौंदळ.