मोकाट सुटला मारेकरी; बघत राहिले गावकरी
By Admin | Updated: April 25, 2016 00:28 IST2016-04-25T00:28:33+5:302016-04-25T00:28:33+5:30
पोलिसांच्या नि:स्वार्थी कार्यावर जनतेनी विश्वास ठेवावा काय यावर आजही प्रश्नचिन्ह लागतात. राजकीय दबाव, मनीपॉवरला सलाम करणारी पोलीस न्याय देत नाही ..

मोकाट सुटला मारेकरी; बघत राहिले गावकरी
प्रकरण कान्हळगाव येथील तरूणीला मारहाणीचे : रक्षकांकडून झाला अपेक्षाभंग, न्यायासाठी पालकांची धडपड
राजू बांते मोहाडी
पोलिसांच्या नि:स्वार्थी कार्यावर जनतेनी विश्वास ठेवावा काय यावर आजही प्रश्नचिन्ह लागतात. राजकीय दबाव, मनीपॉवरला सलाम करणारी पोलीस न्याय देत नाही अशी धारणा सामान्य गरीब लोकांची झाली आहे. गरीब माणसांच्या वेदनेवर मीठ चोळणारी पोलीस न्याय देतील अशी अपेक्षा गरीबांनी आता करु नये असं खात्रीपणे ग्रामीण जनतेला वाटू लागले आहे. ‘मोकाट सुटला मारेकरी, बघत राहिले गावकरी’, अशी चर्चा आता कान्हळगाव(सिरसोली) येथे ऐकायला मिळत आहे.
कान्हळगाव/ सिरसोली येथे रोजगार हमीवरच्या कामावर एका तरुणाने तरुणीला बेदम मारहाण केली. शिविगाळ केली. जवळपास तीन तास ती तरुणी बेशुध्दावस्थेत होती. अशी ही नाजूक अन् मोठी घटना असतांना आंधळगाव पोलिसांनी मारहाण प्रकरणाला ‘अदखलपात्र’ गुन्ह्याचे स्वरुप दिले. यावरुन कायद्याचा धाक राहिला नाही. आज अलिकडे कायदा थोडा बाजूला सोडला तर पोलिसांचा धाक अजिबात शिल्लक नाही. जिने त्या तरुणाचा सपाटून मार खाल्ला ती तरुण युवती गरीब आहे. तीचे आई-बाबा मोलमजूरी करुन पोट भरतात. गरीब जनतेचा वाली नाही, हे पून्हा सिध्द झालं. जेव्हा तो तरुण त्या युवतीला काठीने, लाथा बुक्क्याने मारहाण करीत होता, शिविगाळ करित होता तेव्हा कामावरच्या जनतेची माणुसकी हरविली होती. सगळे तिच्या वेदनेच्या अंताचा तमाशा बघत होते. सहाशे मजूर कामावर असताना त्याला धडा शिकवायला हवा होता. पण नाही, गरीबाची लेक आहे म्हणून त्या घटनेप्रसंगी कोणी अडविण्याचा ‘मर्द’पणा दाखविला नाही. त्या तरुण युवतीचा बाप, माय आपल्या लेकीला सावरत असल्याचे चित्रफित वरुन दिसून येते. माणूसकी तर हरवत आहेत पण, संवेदना ही बोथड झाल्याचे दिसून आले. नंतर मात्र थोड शांत झाल्यानंतर काही मजूरांनी त्या तरुणीला बेशुध्द अवस्थेत उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आंधळगावला नेण्यासाठी मदत केली. उपचारानंतर काही काळाने मुलगी बोलली. तिला गावी आणण्यात आले नंतर मात्र पोलिसांची हुकूमतशाही, बेबंदशाहीच चालली. बयाणासाठी मुलीला पोलिसांनी ठाण्यात बोलविले. तिची बोलण्याची मानसिक अवस्था नसताना तिच्याकडून कशीतरी घटनेची हकीकत नोंद केली.
पोलिसांनी पीडित तरुणी, तिची बहिण व एका महिला ग्रा. पं. सदस्येला सायंकाळपर्यंत ठाण्यात बसवून ठेवले. साहेब, जाब घेतील असं त्यांना सांगण्यात आलं. पण साहेब आले नाही. अखेर कंटाळून त्या तिघ्याही घरी परतल्या. त्याला बसवून ठेवण्याची नाहकच शिक्षा पोलिसांनी दिली. घटना झाल्यावर पोलिसांपर्यंत फिर्यादीच्या अगोदर आरोपीचे साथीदार पोहचल्याचे सांगण्यात आले. लक्ष्मीदर्शन पोलिसांना करण्यात आल्याची गावभर चर्चा आहे. बळ आलेल्या आरोपींच्या भावंडानी सायंकाळी पून्हा फिर्यादीच्या घरासमोर गोंधळ घातला. जीवे मारण्याची धमकी दिली. शिव्यांची लोखोळी वाहिली. दिवसभरात घडलं तीच हिंमत बोलत होती. गाव शांत राहावा म्हणून आरोपीला जाणीवर्पूक अटक केली. दुसऱ्या दिवशी उपविभागीय अधिकारी यांनी जमानत दिली. आरोपी मोकळा सोडला. यावरुन पोलिसांच्या कार्यप्रणालीवर जनतेचा संशय बळावला आहे. त्या तरुणीच्या हाताला दुखापत, मृत्यू होईल या इच्छेने मारहाण,मारांमुळे आंतरिक दुखापत, सायंकाळी घरावर हल्ला, गावात दहशतीचे वातावरण निर्माण करणे या सगळ्या बाबी पोलिसांच्या नजरेत ‘अदखलपात्र’ ठरल्या. गरीब मुलीने आपल्या शिक्षणात लक्ष घालाव, कशाला रोजगार हमीच्या कामावर जावे, आपसात काही देवून-घेवून वाद संपूष्टात आणा, अशी संतप्त करणारी मुक्ताफळे पोलिसांनी वाहिली. गावच्या प्रत्येक बापाला मुलींची चिंता वाटू लागली आहे. आज परक्या मुलीवर असा प्रसंग ओढवला. उद्या माझ्या मुलीसोबत घडलं तर.... ही भविष्याच्या धोक्याची चिंता गावातील मायबापांना सतावत आहे. कान्हळगावात मारहाण प्रकरणामुळे कमालिचे वातावरण तापले आहे.
या तापत्या वातावरणात पोलिसांनी प्रकरण कच्चे बनवून आरोपीला जमानत मिळेल अशी व्यवस्था केली. यावरुन गावात पोलीस प्रशासनाविरुध्द असंतोष निर्माण झाला आहे. पोलिसांना घटनास्थळावरची मौका चौकशी करावी, घटनेची दुखद घटना ज्यांनी डोळ्यात साठविली त्या सर्व मजूरांचे बयान घेण्यात यावे. फिर्यादी तरुणीचे सविस्तर पून्हा बयान घेण्यात यावे, मारहाणीत जी काठी वापरली ती जप्त करावी, पोलिसांनी गावात येवून सखोल भूमिका घेतली आहे. ग्रामस्थानी निषेध म्हणून कामावर बहिष्कार केला आहे. पोलीस प्रशासनाच्या विरोधात सनद मार्गाने लढ्यासाठी ग्रामवासी तयार झाले आहेत. ग्रामवासींयाना दु:ख एवढेच गावातील तरुण मुलीस मारहाण होते. पण, गावातील कोणताही स्थानिक नेता या अन्यायाचा विरोधात नेतृत्व करायला अजूनही पुढे आलेला नाही.