केसलापुरीत समस्यांचा अंबार
By Admin | Updated: October 3, 2015 00:40 IST2015-10-03T00:40:22+5:302015-10-03T00:40:22+5:30
पवनी तालुक्यातील अड्याळहून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलव्याप्त गाव असलेल्या केसलापुरी येथे मुलभूत सोइर ...

केसलापुरीत समस्यांचा अंबार
विशाल रणदिवे अड्याळ
पवनी तालुक्यातील अड्याळहून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलव्याप्त गाव असलेल्या केसलापुरी येथे मुलभूत सोइर सुविधांचा वाणवा आहे. ३००लोकवस्तीचे गाव असलेल्या केसलापुरीत विकासाची गंगा अजुनही पुर्णत: पोहोचलेली नाही. विशेष म्हणजे वनविभागातर्फे या गावात कुऱ्हाडबंदी, शिकारबंदी जंगलात गुऱ्हे चराई बंदी करण्यात आली आहे.
केसलापुरी गावात २ विहीर आहेत. त्यापैकी एक भूकंपाच्या झटक्याने निकामी तर एक पिण्यायोग्य पाणी नसतानाही नाईलाजास्तव तेच पाणी प्यावे लागत आहे. पथदिवे नाही. गावात चार बोअरवेल असून त्या निकामी आहेत. स्मशानभूमित शेड नसून तिथेही पाण्याची व्यवस्था नाही. एकंदरीत पावलो पावली या ग्रामस्थांच्या नशिबी समस्यांची रांगच उभी आहे.
तीन सप्टेंबर रोजी गावात वनविभागातर्फे गॅस कनेक्शन ग्रामस्थांना देण्यात आले. त्याप्रसंगी आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांच्या वनविभागाचे अधिकारी वरखडे, वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाठक, क्षेत्र सहायक बागडे, मुनिर शेख, अतुल मुलकलवार यांनी कार्यक्रमात ३० सप्टेंबर पर्यंत गावातील ३६ महिला कामगारांची मजुरी देण्यात येईल म्हणून घोषणा केली होती.
येथील ३६ महिला रोपवन कामगारांना ३५ दिवसांची केलेल्या कामाची मजुरी मागायला भंडारा तर दोनदा अड्याळ वनपरिक्षेत्र कार्यालयात चकरा माराव्या लागल्या तरीही मजुरी मिळालेली नाही.
गावातील विहिरीची पाहणी करून पिण्याच्या पाण्याची समस्या लवकरच सोडविण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आल्याने उपस्थित ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कार्यक्रमही थाटात पारी पडला. परंतु एक महिना लोटूनही दिलेल्या आश्वासनाची कुणालाही आठवण झाली नाही.
ना पाण्याची व्यवस्था झाली, ना रोपवाटिकेतील महिला मजुरांना हक्काची मजुरी मिळाली. त्यांनी आपली समस्या घेवून जायचे तरी कुणाकडे असा सवाल उपस्थित होत आहे. समस्या सोडविणारे लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांनीच आश्वासन देवून सुद्धा महिन्याभरात समस्या सुटत नसतील तर विश्वास ठेवायचा कुणावर, असे येथील नागरिकांनी बोलुन दाखविले. समस्यांबाबतीत पाठपुरावा केला तर काही प्रमाणात नक्कीच समस्या सुटतील. मात्र याकडे गांर्भियाने लक्ष देणे गरजेचे आहे. केसलापुरी वासीयांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्या, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सरकारी अनुदान न मिळाल्याने यांना बोलल्या प्रमाणे मजुरी मिळाली नाही परंतु २० आॅक्टोबरला यांना ही थकबाकी मजुरीची रक्कम लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
-महेश पाठक
वनपरिक्षेत्राधिकारी,अड्याळ