काटा दहावर तरीही शुकशुकाट !
By Admin | Updated: January 5, 2015 22:57 IST2015-01-05T22:57:10+5:302015-01-05T22:57:10+5:30
‘गतिमान प्रशासन’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व पर्यायाने राज्यात सत्तारूढ झालेल्या युती सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. मात्र जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा

काटा दहावर तरीही शुकशुकाट !
कारभार लेटलतीफ कर्मचाऱ्यांचा
प्रशांत देसाई - भंडारा
‘गतिमान प्रशासन’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व पर्यायाने राज्यात सत्तारूढ झालेल्या युती सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. मात्र जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचारीच या धोरणालाच सुरूंग लावण्याचे काम करीत आहेत. सोमवारी सकाळी दहा ते साडेदहा वाजताच्या वेळेत दोन्ही कार्यालयात ‘स्टिंग आॅपरेशन’ केले असता तेथील कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रीक यंत्रावर हजेरी लावली खरी, मात्र टेबलवर बसून कर्तव्य पार पाडण्याऐवजी कुणी बाहेर तर कुणी चहाटपरीवर बसून गप्पा करीत असल्याचे आढळून आले.
जिल्ह्यात सध्या सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामाच्या वेळा योग्य पद्धतीने पाळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. असे असताना जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून या निर्देशांकडे डोळेझाक करण्यात येत आहे. या शासकीय कार्यालयाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत आहे.
या कालावधीत दुपारी २ ते २.३० या काळात कर्मचाऱ्यांना जेवणाचा ब्रेक घेण्याचा नियम आहे. अशा वेळा ठरवून दिलेल्या असतानाही या कार्यालयातील काही प्रामाणिक कर्मचारी वगळता अन्य वेळकाढू कर्मचाऱ्यांनी या वेळापत्रकाला धाब्यावर बसविले आहे.
सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे कर्मचारी सकाळी १० वाजता कर्तव्यावर हजर राहतात की, यासाठी या कार्यालयात फेरफटका मारला असता, कर्मचाऱ्यांचा वेळकाढूपणा समोर आला.
यावेळी जिल्हा परिषद मधील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या तळमजल्यावर लावण्यात आलेल्या बायोमेट्रीक यंत्रावर आंगठ्याची नोंद करण्यासाठी एकच घाई केली होती. मात्र, काही वेळेनंतर ते आपआपल्या कर्तव्यावर जाणे अपेक्षित होते. मात्र थंडीमुळे ते उन्हात राहणे पसंत केले. यामुळे त्यांच्या टेबलवर कामासाठी पोचलेल्या नागरिकांनाही ताटकळत उभे राहावे लागले.
यातील काही कर्मचारी तर, कामासाठी आलेल्यांना ‘भाऊ, थंडी आहे. जरा उन्हात शेकू द्या. तुम्ही पण उन्हात उभे राहून गरम व्हा, वेळ असेल तर चहा पिऊन तासभरात या’ असा सल्ला देण्यात धन्यता मानत होते. याचवेळी काही कर्मचारी कर्तव्यदक्ष आढळून आले. त्यांनी मात्र बाहेरुन आलेल्या लोकांच्या समस्या जाणून घेत होते.