शेतकरी संकटात : शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न?देवानंद नंदेश्वर - भंडाराधानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निर्सगाच्या कोपामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यानंतरही जिल्हा प्रशासनाने नुकतीच खरीप पिकांची नजर अंदाज आणेवारी ७४ पैसे घोषित केली आहे. परीणामी शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. सुरुवातीला दृष्काळपरीस्थिती घोषित केल्यानंतर आता पिक परीस्थिती उत्तम कशी झाली, असा सवाल शेतकरी करीत आहेत.गत दशकापासून भंडारा जिल्हा निसर्ग प्रकोपाचा सामना करीत आहे. यावर्षी त्यात आणखी भर पडली. मृग आणि रोहणी नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या लांबल्या. शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. नंतरच्या काळात थोडा पाऊस बरसला. त्यानंतर पडलेल्या कडक उन्हामुळे पीक वाळत आहे. धानपिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. महागडी किटकनाशके खरेदी करुन पिक वाचविण्याचा शेतकरी धडपड करीत आहेत. आता पिकांना पावसाची आवश्यकता आहे. परंतु पावसाने पाठ फिरवल्याने धानपिक धोक्यात आहेत. शेतकऱ्यांवर बिकट परीस्थिती ओढावली आहे. कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या नजरअंदाज पैसेवारीत पिक स्थिती उत्तम दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला दृष्काळपरीस्थिती घोषित केल्यानंतर आता पिक परीस्थिती उत्तम कशी झाली, असा सवाल शेतकरी करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने ८४७ गावांची नजर अंदाज आणेवारी ७४ पैसे दर्शविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. भंडारा तालुक्यातील १७० गावांची आणेवारी ७५ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची आणेवारी ७४ पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची आणेवारी ७७ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची आणेवारी ७१ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची आणेवारी ७४ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची आणेवारी ७० पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची आणेवारी ७५ पैसे दाखविण्यात आली आहे. यातील २७ गावे अकृषिक पाण्याखालील पिक असल्यामुळे त्या गावांची पैसेवारी जाहिर करण्यात आली नाही. यामध्ये भंडारा तालुक्यातील चार, तुमसर तालुक्यातील सात, पवनी १२, साकोली दोन, तर लाखनी तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ८७८ एकूण गावांपैकी ८६४ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. १० गावांमध्ये दोन तृतीयांश क्षेत्रामध्ये खरीप पिकांची पेरणी केलेल्या रबी गावे आहेत. यापैकी ८४७ गावांच्या खरीप पिकांची पैसेवारी जाहिर करण्यात आली. सर्व ८४७ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त दाखविण्यात आली. यावर्षी जिल्हा प्रशासनाने धान उत्पादक शेतकरी संकटात असतानाही नजर अंदाज आणेवारी ७४ पैसे दाखवून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप होत आहे़
खरीप पिकाची नजरअंदाज आणेवारी ७४ पैसे
By admin | Updated: October 5, 2014 22:58 IST