नाला खोलीकरण ठरला शेतकऱ्यांसाठी जलसंजीवनी
By Admin | Updated: September 21, 2016 00:31 IST2016-09-21T00:31:06+5:302016-09-21T00:31:06+5:30
१,२१९ लोकसंख्येच्या दावेझरी येथील लोकांचा शेती करणे हाच मुख्य व्यवसाय आहे.

नाला खोलीकरण ठरला शेतकऱ्यांसाठी जलसंजीवनी
दावेझरी येथे पीक डौलात : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गतचा यशस्वी प्रयोग
भंडारा : १,२१९ लोकसंख्येच्या दावेझरी येथील लोकांचा शेती करणे हाच मुख्य व्यवसाय आहे. या गावात खरीप हंगामात भात व बांधावर तूर पिके घेतली जातात. रब्बी हंगामात गहू, लाखोरी, हरभरा पिकाची लागवड केली जाते.
दावेझरी येथील तुकाराम शहारे, रामदास वाहणे, पृथ्वीराज कटरे यांच्याकडे ०.८० हेक्टर कोरडवाहू शेती असून पावसाच्या पाण्यावर भात व तूर पिके घेतले जात होते. परंतु त्यांची शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे एखाद्यावर्षी पाऊस कमी झाला तर भाताचे पीक लागवड करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांना नेहमी दुष्काळजन्य परिस्थितीला तोंड द्यावे लागत असे, अशा स्थितीमध्ये त्यांना कर्ज काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत असे. दावेझरी पाणलोट समितीमध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत मजगी, पुनरूज्जीवन व जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला खोलीकरण, दुरूस्ती ही कामे करण्यात आली. त्यामध्ये प्रकल्पाच्या माध्यमातून तीन शेततळे व ८.२५ हेक्टर क्षेत्रात मजगी पुनरूज्जीवन २९.१३ हेक्टरवर करण्यात आले. यावर्षात पाऊस तुरळक प्रमाणात पडल्यामुळे शेतकऱ्यांनी वसुंधरा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन व जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला खोलीकरण केले. त्यामुळे साठलेल्या पाण्याचा उपयोग करून धान रोवणीकरीता शेतात पाणी सोडण्यास सुरूवात केली, आणि पाहतापाहता आठ हेक्टर शेती ओलित करून धानाची लागवड केली.
या नाला खोलीकरणाचे वैशिष्टय म्हणजे पहिल्या पावसात नाल्याचे पात्र पुर्ण भरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नर्सरी लवकर तयार करुन हंगामात पावसात खंड पडून देखील शेतालगतच्या नाला खोलीकरण व जुन्या सिमेंट नाला बांध दुरूस्तीमुळे पाणी संचय करून लगतच्या शेतकऱ्यांनी इलेक्ट्रीक इंजिन व डिझेल इंजिन बसवून धान रोवणीकरीता पाण्याचा उपयोग केला. शेतकरी शेतालगत तयार करण्यात आलेल्या नाला खोलीकरणाच्या शासनाच्या कामावर समाधानी आहेत. पाण्याची भीषण टंचाई असतानासुध्दा त्यांना इतरत्र न भटकता वेळोवेळी पाण्याची गरज भागविता आली. जलयुक्त शिवारच्या कामामुळे येथील शेतकऱ्यांचा गहू व हरभरा लागवड करण्याचा मानस आहे. यामाध्यमातून आर्थिकस्तर उंचावण्यासाठी तुकाराम शहारे, रामदास वाहणे, पृथ्वीराज कटरे यांच्यासह सहा शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवारांतर्गत केलेले नाला खोलीकरण जलसंजीवनीच ठरली आहे. (शहर प्रतिनिधी)
या नाला खोलीकरणावर २ लाख ४५,५१७ इतका निधी खर्च करण्यात आला असून सरासरी ३२० मीटर लांबीचे नाला खोलीकरण करण्यात आले. याचा वापर भात पिकाला पाणी देण्यासाठी करण्यात येत असून त्यामुळे या शेतकऱ्यांना आता पावसाच्या पाण्याअभावी पीक जाण्याची भीती राहिली नाही.
- बी.एम. समरीत,
कृषी सहाय्यक, सिहोरा,
ता. तुमसर.