जिल्ह्यातील ६१७ गावांवर पाणीटंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:00 AM2020-02-14T06:00:00+5:302020-02-14T06:00:48+5:30
जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या मोठी आहे. तलावांची लक्षणीय उपस्थिती व त्यातल्या त्यात वैनगंगा व तिच्या उपनद्यांमुळे पाण्याची पातळी असतेच. मात्र पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही. अनेक गावामंध्ये पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे प्रमाण नगण्य आहे.
देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील भूगर्भात पाण्याचा मुबलक साठा आहे. म्हणूनच जिल्हा प्रशासनाच्या यादीत टँकरमुक्त म्हणून घोषित आहे. प्रशासनाने संभाव्य पिण्याचे पाणीटंचाई निवारणार्थ बृहत आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील एकुण ६१७ गावातील ११६३ स्त्रोतांना पाणीटंचाईची झळ सोसण्याची शक्यता वर्तविली आहे. यावर १२ कोटी ९० लाख ८१ हजार रुपयांची प्रस्तावित उपाययोजना करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या मोठी आहे. तलावांची लक्षणीय उपस्थिती व त्यातल्या त्यात वैनगंगा व तिच्या उपनद्यांमुळे पाण्याची पातळी असतेच. मात्र पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही. अनेक गावामंध्ये पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे प्रमाण नगण्य आहे. जूनदरम्यान अनेक गावांमध्ये पाणी पेटणार आहे. याचा अनेक नागरिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ १ जानेवारी ते ३१ मार्च २०२० चा कृती आराखडा तयार केला. परंतु या अहवालात १०५ गावातील विहिरी खोल करणे व गाळ काढणे, चार गावातील खासगी विहिरी अधिग्रहित करणे, १०३ गावात नळयोजनांची दुरूस्ती, १३९ गावातील विंधन विहिरींची दुरूस्ती करणे, ४६७ गावात विंधन विहिर घेणे, ५९ गावात कूपनलिका करण्याचे अहवालात नमूद आहे. जिल्ह्यातून वैनगंगा नदी वाहत असल्यामुळे पाण्याचा स्त्रोत बऱ्यापैकी आहे. नळयोजना प्रभावी करण्याची गरज आहे़ पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही.
१६३ स्त्रोतांसाठी सूचविल्या उपाययोजना
संभाव्य पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता प्रशासनाने उपाययोजना केली आहे. भंडारा जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायती असून गावांची संख्या ८७८ आहे. यापैकी यावर्षीच्या उपाययोजनेमध्ये ६१७ गावे प्रस्तावित आहेत. विहिर खोल व विहिरीतील गाळ काढण्यासाठी ७० लाख नळयोजना विशेष दुरुस्तीसाठी ४ कोटी ३८ लाख प्रस्तावित आहेत.
जिल्हा १०० टक्के टँकरमुक्त आहे. प्रशासनातर्फे उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. सर्वेक्षणानंतर जी कमी खर्चाच्या कामांवर उपाययोजना करण्यात येईल. भंडारा जिल्ह्यात जानेवारी ते मार्च दरम्यान ३३७, तर एप्रिल ते जून महिन्यामध्ये २८० गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता आहे.
-विशाल मंत्री, भूवैज्ञानिक,जिल्हा परिषद, भंडारा