रखडलेल्या सौंदर्यीकरण कामांची चौकशी करा
By Admin | Updated: May 19, 2016 00:30 IST2016-05-19T00:30:17+5:302016-05-19T00:30:17+5:30
शहरातील सार्वजनिक व्यवस्था, सौंदर्यीकरण, वीज रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, बगीचे आदी अनेक प्रकारच्या सोयी सुविधा ....

रखडलेल्या सौंदर्यीकरण कामांची चौकशी करा
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
भंडारा : शहरातील सार्वजनिक व्यवस्था, सौंदर्यीकरण, वीज रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, बगीचे आदी अनेक प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही नगरपरिषदेची आहे. या सर्व बाबींमध्ये नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे, अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे अपयशीच ठरत आलेली आहे. असाच काहीसा प्रकार शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण करण्याच्या बाबतीत झालेला आहे. या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मागील दोन महिन्यापुर्वीपासून शहरातील शास्त्री चौक, राजीव गांधी चौक या चौकांचे सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने ऐन चौकांच्या मध्ये मोठमोठे खड्डे खोदून, कॉलम उभे करून बांधकाम सुरू केले. बांधकाम कशाचे आहे, कोणत्या प्रकारे चौकांचे सौंदर्यीकरण करणार आहे, याची नगरपालिकातर्फे शहरातील जनतेलाच नव्हे तर त्या प्रभागातील नगरसेवकांना सुद्धा याची पुसटशीही कल्पना न देता बांधकाम सुरू केले. आमच्या प्रभागात आम्हाला न विचारता बांधकाम करता म्हणून काही नगर सेवकांनी सदर बांधकामाला विरोध केला. वास्तविक बघता शहरात काही विकास कामे करावयासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे, पदाधिकाऱ्यांकडे काही व्हीजन असणे आवश्यक आहे. परंतु मुळात व्हीजनच नसलेल्या, केवळ 'माल सुतोचाच नारा देणाऱ्या पालिकेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सौंदर्यीकरणाच्या नावावर काहीतरी उभे करायचे म्हणून बांधकाम सुरू केल्याचे निवेदनात नमूद आहे. हे बांधकाम दोन महिन्याहून अधिक काळापासून अर्धवट आहेत. या बांधकामाशेजारी पडलेल्या रेतीमुळे, विटांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. न.प. कार्यालयातून माहिती घेतली असता आता हे अर्धवट बांधकाम पाडून त्या ठिकाणी महापुरूषांचे पुतळे उभारणार असल्याचे कळले. ऐन चौकामध्ये असलेले पुतळे चौकामधून हटवून ते बाजूला करण्याचे आदेश न्यायालयाचे असताना न.प. चौकांमध्ये न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन महापुरूषांचे पुतळे उभारणार काय, त्यासाठी झालेले बांधकाम पुन्हा तोडून नव्याने बांधकाम करणार मग झालेल्या बांधकामाच्या खर्चाचे काय, असा सवाल करीत हा खर्च सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा, अशी मागणी उपजिल्हा प्रमुख संजय रेहपाडे, शहर प्रमुख नितीन साकुरे, सुरेश धुर्वे, विशाल लांजेवार, मुकेश थोटे, धनंजय धुळसे, रोशन कळंबे, मयुर लांजेवार, सुधीर उरकुडे, जयदेव गभने, दिनेश गजबे, पंकज दहिकर, संजय दमाहे आदींनी निवेदनातून केलेली आहे. (नगर प्रतिनिधी)