किडींचा प्रादुर्भाव; धान उत्पादक संकटात
By Admin | Updated: November 13, 2015 00:54 IST2015-11-13T00:54:55+5:302015-11-13T00:54:55+5:30
रात्रंदिवस मेहनत करून, लहरी निसर्गाचा सामना करीत, यावर्षीच्या तुटपुंज्या पाण्याचे कसेतरी नियोजन करून,

किडींचा प्रादुर्भाव; धान उत्पादक संकटात
मासळ : रात्रंदिवस मेहनत करून, लहरी निसर्गाचा सामना करीत, यावर्षीच्या तुटपुंज्या पाण्याचे कसेतरी नियोजन करून, सर्वोत्तम पिक घेण्याची तयारी असताना ऐन गर्भावस्थेत व कापणीला येणाऱ्या धान पिकाला गाद, तुडतुडा या व इतर किडीने जबरदस्त मारा केल्याने विशेषत: भारी धान उत्पादक संकटात सापडला आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने आपला लहरीपणा दाखवायला सुरुवात केली होती. पेरणीपासूनच पाऊस कमी अधिक पडताना शेतकऱ्यांच्या नजरेस पडला. निसर्गाचा कोप नेहमीप्रमाणे यावर्षीही येईल असे वाटत असतानाच कमी पावसात कशीबशी रोवणी आटोपली. त्यानंतर वेळोवेळी पाण्याची कमतरता सहन करत पीक जोमात वाढले. परंतु ऐन गर्भावस्थेत असतानाच हलक्या जातीच्या धानाला विविध रोगांनी ग्रासायला सुरुवात झाली. त्यावरही आर्थिक भुर्दंड सहन करत बळीराजाने मात करण्याचा प्रयत्न केला. हलके धानाच्या पाठोपाठ भारी धान गर्भावस्थेत आले. यावेळी मात्र तुडतुड्यासारख्या किडीने अक्षरश: धानावर प्रहार करायला सुरुवात केली. काही काळायच्या आतच एका रात्रीत तुडतुडा संपूर्ण शेतात पसरू लागला. एकामागोमाग एक असे फवारणीचे डोस शेतकरी देवू लागला. धान कापणीला येवून ठेपले परंतु तुडतुड्यावर नियंत्रण होवू शकले नाही. पेरणीपासून ज्या शेतकऱ्यांनी पिकासाठी अहोरात्र मेहनत केली, रक्ताचे पाणी केले आणि पुढील जीवनात मदतीची आस ठेवून पीक वाढवून उत्पादन घेण्याची अपेक्षा ठेवली. ती मात्र या चार दोन दिवसात संपुष्टात आली. रोगांच्या भीतीने काही शेतकरी, धान लोंबी भरण्याच्या आतच कापायला सुरुवात करू लागला. काहींचे धान तर तणसच बनून शेतात उभे आहे. सध्या अंतीम टप्प्यात तणसच बनून शेतात उभे आहे. सध्या अंतिम टप्प्यात धान कापणी सुरु आहे. परंतु धानाला लोंबीत धानच नाहीत काही ठिकाणी धानाची मळणी सुरु झाली. परंतु उताराच नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व संतापाची लाट पसरली आहे. ज्या भरवशावर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत होत्या, त्या आशा त्यांच्या धुळीस मिळत आहेत. उत्पादनात घट निर्माण झाल्याने, आर्थिक प्रश्न कसे सोडवायचे हा बिकट प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे आ वासून उभा आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात रोगराईने झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारे आहे. सर्वात अधिक फटका भारी व उच्च प्रतीच्या धान उत्पादकांना पडला आहे.
धान उपादकांच्या नशिबी दु:खाचेच डोंगर अनुभवायला मिळत आहेत. तूर्त किडींच्या प्रादुर्भावाने धान उत्पादक संकटात पडला असून निरुपाय झाला आहे. (वार्ताहर)