पाणी शुद्धीकरणाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
By Admin | Updated: June 15, 2014 23:24 IST2014-06-15T23:24:32+5:302014-06-15T23:24:32+5:30
तालुक्यातील चिचटोला येथे जलजन्य आजाराचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाद्वारे सर्वेक्षण करून सात रुग्णांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पाणी शुद्धीकरणाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
लाखनी : तालुक्यातील चिचटोला येथे जलजन्य आजाराचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाद्वारे सर्वेक्षण करून सात रुग्णांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हगवण, उलटी, ताप असलेले २२ रुग्ण आढळून आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.खंडारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद मोटघरे, डॉ.डी.डी. अंबादे, डॉ.अशोक चोले व आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावाचे सर्व्हेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यात.
चिचटोला येथे खंडविकास अधिकारी हेमंत मेहर यंनी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. पिण्याचे पाण्याच्या स्त्रोतांचे ब्लिचिंगद्वारे शुद्धीकरण करण्याबाबत निर्देश दिले. पिण्याच्या पाण्याचे नियमित व प्रमाणशीर शुद्धीकरण करण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला तंबी दिली.
गावातील सर्व पिण्याचे पाण्याचे स्त्रोतांचे शुद्धीकरण ग्रामपंचायतने नियमित करावे व ब्लिचिंगचा तीन महिनेपर्यंत पुरेल एवढा साठा ठेवण्याचे आदेश तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद मोटघरे यांनी दिले आहे. गावालतच खतांचे खड्डे नसावे, प्रत्येक वॉर्डात स्वच्छता मोहीम राबवावी, निरुपयोगी टायर्स, करवंट्या, प्लास्टिक वस्तू अशा अनावश्यक गोष्टी नष्ट कराव्यात, पाण्याची डबकी बुजविणे, पाणी वाहते करणे, आठवड्यातून एक कोरडा दिवस जाहीर करणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडावे, ताप आल्यानंतर रक्ताची तपासणी करावी अशा सूचना आरोग्य विभागाद्वारे ग्रामपंचायतला दिल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)