पिंडकेपार ठरले आदर्श मतदान केंद्र
By Admin | Updated: October 15, 2014 23:15 IST2014-10-15T23:15:56+5:302014-10-15T23:15:56+5:30
नागरिकांमध्ये मतदान करण्यासंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासोबतच लोकशाही बळकटी करण्यासाठी विश्वास संपादन करण्यासाठी निवडणूक विभागातर्फे विधानसभा क्षेत्रानिहाय आदर्श मतदान केंद्र

पिंडकेपार ठरले आदर्श मतदान केंद्र
निवडणूक विभागाचा उपक्रम : गावाच्या इतिहासात मानाचा तुरा
भंडारा : नागरिकांमध्ये मतदान करण्यासंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासोबतच लोकशाही बळकटी करण्यासाठी विश्वास संपादन करण्यासाठी निवडणूक विभागातर्फे विधानसभा क्षेत्रानिहाय आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले. भंडारा विधानसभा क्षेत्रातील कोरंभी (देवी) गावातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले. मतदान केंद्रात प्रवेश केल्यावर मतदारांना प्रसन्नचित्त वातावरण मिळावे व मतदान करावे हा या मागील उद्देश.
कोेरंभी (देवी) या गावाच्या चौपाल परिसरात स्थित जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात यावे, असे ठरविण्यात आले. त्याअंतर्गत शाळेची रंगरंगोटी, स्वच्छता, विद्युत व्यवस्था यासह येणाऱ्या मतदारांना बसण्यासाठी टेबल, खुर्ची, चटई, पिण्याच्या पाण्याची सुविधा, मतदार अनुक्रमांक शोधण्यासाठी मदत केंद्र आदींची व्यवस्था करण्यात आली होती. शाळेचा परिसर स्वच्छ करून प्रवेश द्वारावर सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली. विद्यार्थीनींचे लेझिम पथक येणाऱ्या मतदारांचे स्वागत करीत होते. केंद्रात उपस्थित निवडणूक अधिकारी मतदारांना आवश्यक ती सूचना व मदत करीत होते. कोणत्याही मतदाराचे मतदान करण्याचे हक्क हिरावू नये याची दक्षता घेत होते. सकाळ सत्रात पाऊस बरसल्यामुळे मतदारांची संख्या कमी होती. मात्र ११ वाजतानंतर मतदान करणाऱ्यांची संख्या वाढू लागली.
दुपारी १ वाजतापर्यंत या केंद्रात ३० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. गावाची लोकसंख्या दोन हजारांच्या आसपास असून मतदारांची एक हजार १२८ इतकी आहे. या गावचे तलाठी नेवारे यांनी सांगितले की, गावातील नागरिकांना मतदान करण्यासाठी कोणतीही गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे. पावसामुळे व्यत्यय आला असला तरी ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे कोरंभी येथील हे आदर्श मतदान केंद्र खरच नागरिकांसाठी तद्वतच संपूर्ण गावासाठी आदर्श ठरले आहे. भंडारा तालुक्यातून फक्त कोरंभी येथील केंद्राला आदर्श मतदान केंद्र म्हणून निवडल्याने या गावाच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला गेला आहे. (प्रतिनिधी)